श्रीनगर – सरकारी सेवेत असणाऱ्या काश्मिरी पंडित कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या सुरक्षित ठिकाणी करण्याचा निर्णय काश्मीर विभागीय प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार, त्यांच्या नियुक्त्या जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी किंवा शहरांमध्ये होण्याची शक्यता आहे.
दहशतवाद्यांनी सरकारी कार्यालयात घुसून राहुल भट या काश्मिरी पंडित कर्मचाऱ्याची गोळ्या घालून हत्या केली. बडगाम जिल्ह्यात 12 मे यादिवशी घडलेल्या त्या घटनेमुळे काश्मिरी पंडित कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्या कर्मचाऱ्यांनी हत्येच्या निषेधासाठी बुधवारी सलग सातव्या दिवशी निदर्शने केली. जम्मूसारख्या सुरक्षित ठिकाणी बदल्या करण्याची मागणीही ते करत आहेत.
त्यापार्श्वभूमीवर, काश्मीर विभागीय प्रशासनाने दहशतवाद्यांचा कमी धोका असणाऱ्या ठिकाणी काश्मिरी पंडित कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याचे ठरवले आहे. अर्थात, काश्मिरी पंडितांच्या बदल्या प्रामुख्याने जम्मूत करणार का त्याविषयीचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. दहशतवाद्यांनी मागील काही काळापासून टार्गेट किलिंगचे नापाक सत्र अवलंबले आहे. त्यातून दहशतवादी काश्मिरी पंडित आणि परप्रांतीयांना लक्ष्य करत आहेत.