नागरिकांची तहान भागविण्यासाठी सुरू होते 860 टॅंकर
शेवगावातील 6 तर पाथर्डी तालुक्यातील 5 चारा छावण्या बंद
नगर – जिल्ह्यात दुष्काळी परिस्थीती निर्माण झाल्याने, पशुधन वाचविण्यासाठी गेल्या चार महिन्यांपासून जिल्ह्यात 504 चारा छावण्या सुरू होत्या. यामध्ये 3 लाख 32 हजार जनावरे होती. गेल्या दोन-तीन दिवसांपासून वरुणराजाची कृपा दृष्टी झाल्याने पाथर्डी तालुक्यातील 5 चारा छावण्या तर शेवगाव तालुक्यातील 6 चारा छावण्या बंद झाल्या असून, छावणीतील जनावरे घरी नेत आहेत.
नगर जिल्ह्यात शनिवार व रविवारी अनेक तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. एका दिवसामध्ये 465 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यामध्ये मागील वर्षी पडलेल्या अल्प पावसामुळे नागरिक दुष्काळाचा सामना करीत आहेत. प्रशासनाकडून ग्रामीण भागातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी तब्बल 860 टॅंकर सुरू करण्यात आले. तर पशुधन वाचविण्यासाठी 504 चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. आता त्यापैकी अनेक चारा छावण्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. पाऊस झाल्याने अनेक चारा छावणीमध्ये चिखल झाला आहेत. तर जनावरांसाठी केलेला निवारा वादळाने उडाला आहे.
जिल्हाभरात आजमितीस 493 चारा छावण्या सुरु असून, या छावण्यांत तब्बल 3 लाखांच्या वर जनावरे आहेत. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने, जिल्हा दुष्काळात होरपळला. पाण्याअभावी खरीप हंगाम हाती लागला नाही. परतीच्या पावसाने पाठ फिरविली. त्यामूळे रब्बी पिके देखील उगवली नाहीत. डिसेंबर महिन्यापासून चारा टंचाई निर्माण झाली. पावसाअभावी भूजलपातळी खालावली गेली. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढू होवू लागली आहे. जनावरांना चारा आणि पाणी एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे, यासाठी शासनाने जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करण्याचा निर्णय घेऊन पशुपालकांना दिलासा दिला होता.