नवी दिल्ली – दिल्ली दंगलीच्या विषयावर संसदेत चर्चा सुरू करा या मागणीमुळे सध्या विरोधी पक्षांनी संसदेचे कामकाज रोखून धरण्याचे सत्र अवलंबले आहे. त्यामुळे नाराज झालेले लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी आज दुसऱ्या दिवशीही लोकसभेच्या कामकाजापासून दूरच राहणे पसंत केले आहे. ते आजही सभागृहात आले नाहीत. त्यांच्या ऐवजी सभापतीपदाच्या तालिकेवरील अन्य सदस्य सभागृहाचे कामकाज चालवत आहेत.
आज बीजेडीचे नेते भृतहरी माहताब यांनी प्रश्नोत्तराच्या तासाचे कामकाज अध्यक्षपदावरून सांभाळले. ते म्हणाले की लोकसभेच्या सध्याच्या गदारोळामुळे कोणालाच लाभ होणार नाही अशी खंत सभापती ओम बिर्ला यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी सदस्यांच्या वर्तणुकीविषयी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे असेही माहताब यांनी सांगितले.
आजही माहताब यांच्या कामकाजच्यावेळीही सदस्यांनी गोंधळ घालत कामकाज रोखून धरले त्यावेळी त्यांनी सदस्यांना सांगितले की सरकारने या विषयावर होंळी नंतर चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे त्यामुळे सदस्यांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. सध्या दिल्ली दंगलींबरोबरच करोनाचा प्रसार हे देशापुढील मोठे आव्हान आहे या दोन्ही विषयांवर सभागृहात चर्चा व्हायला पाहिजे असे मतही त्यांनी व्यक्त केले.