मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या नेत्यांची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची साडे चार वाजता होणारी नियोजित भेट पुढे ढकलण्यात आली. बहुतांश नेते निवडणूक खर्चाचा लेखा परीक्षण अहवाल निवडणूक आयोगाला सादर करण्याच्या कामात गुंतल्याने हा निर्णय घेण्यता आला. त्यासाठी आजची अंतिम मुदत होती.
आता राज्यपालांना भेटण्यासाठी नवा दिवस निश्चित करण्यात येईल. राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था आणि ढासळलेले प्रशासन यावर हे शिष्टमंडळ राज्यपालांशी चर्चा करणार होते. राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेनेने सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याने या बैठकील महत्व आले होते.
दरम्यान सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेनेला पूर्ण पाच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसला स्वतंत्र उपमुख्यमंत्रीपद यावर सहमती झाली आहे. तसेच सत्तेचे वाटप 14, 14 आणि 12 मंत्रीपदांमध्ये करण्यात आले आहे. सत्तेचा कार्यकाळ पूर्ण करण्यासाठी किमान समान कार्यक्रम आखण्यात आला आहे. त्यात शतकरी आणि तरूणांच्या मुद्यांना प्राधान्य दिले असले तरी शिवसेनचा हिंदुत्वाचा मुद्दा बाजूला ठेवला आहे.