– जयंत पाटीलांनी केला घोटाळ्याचा आरोप
– शासनाचे कोट्यवधी रूपयांचा महसूल बुडाला
– चंद्रकांत पाटलांनी आरोप फेटाळले
मुंबई – विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान काल सत्ताधारी मंत्री तसेच विरोधी पक्षातील दोन पाटलांमध्ये आरोप-प्रत्यारोपांनी चर्चेचा विषय ठरला होता. बिल्डरांचा फायदा करून देण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्य प्रशासनाचा ४२ कोटींचा महसूल बुडवल्याचे प्रकरण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी समोर आणले.
याच पार्श्वभूमी आज राष्ट्रवादीसह सर्व विरोधी पक्षांच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर निषेध केला. भ्रष्टाचाराविरोधात फडणवीस सरकारने सत्ता मिळवली. मात्र, भाजपचे १६ मंत्रीच भ्रष्टाचार करायला लागले तर राज्याचा कारभार चुकीच्या सरकारच्या हातात आहे. त्यामुळे अशा घोटाळेबाज सरकारविरोधात राष्ट्रवादी आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.
भ्रष्टाचार झालेला नाही – चंद्रकांत पाटील
लोकसभा निवडणुकांत जयंत पाटील यांच्याच मतदारसंघांत भाजपाने मुसंडी मारली. त्यामुळे आग एकिकडी लागली असून धूर दूसरीकडून बाहेर पडत असल्याचा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. आपल्यावरील भूखंडा घोटाळ्याचा आरोप पेैटाळतानाच हवेली तालुक्यातील केसनंद येथील जमिन ही मुळात देवस्थान इनाम जमिनच नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
1885 सालच्या ब्रिटीश कालीन मूळ नोंदीत ती खासगी जमिन असल्याची स्पष्ट नोंद आहे. तोच आधार घेत आपण ती खासगी जमिन असल्याचा निर्णय दिला आहे. तसेच बालेवाडी येथील जमिन प्रकरणात संबंधित पार्टीने या जमिनीची मोजणी एका अधिकाऱ्याकडून काढून दुसऱ्या अधिकाऱ्याकडे देण्यात यावी अशी मागणी केली. ती आपण मान्य केली.या प्रकरणात कोणतीही स्थगिती मी दिलेली नाही. हा केवळ एक प्रशासकीय निर्णय आहे असा खुलासा चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला.