मुंबई – क्रुझ पार्टी प्रकरणाच्या संबंधात आज गोसावीच्या बॉडीगार्डने जे आरोप केले आहेत, त्यात केंद्रीय यंत्रणांमार्फत महाराष्टाला बदनाम करण्याचे व चित्रपटसृष्टीतून मोठ्या प्रमाणात खंडण्या गोळा करण्याचे षडयंत्र उघडकीला आले असून आता या प्रकरणाची महाराष्ट्र पोलिसांनी स्वताहून दखल घेऊन संबंधीतांवर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
आज काही प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटले आहे की, या प्रकरणात नवाब मलिक गेले काही दिवस जे सांगत होते ते खरे असल्याचे सिद्ध होत आहे. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून महाराष्ट्राला बदनाम करण्याचे कारस्थान सुरू असल्याचेही यातून स्पष्ट झाले आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
याच संबंधात ट्विटरवर प्रतिक्रीया देताना संजय राऊत यांनी म्हटले आहे की, आर्यन खान प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईल एनसीबीने कोऱ्या कागदावर स्वाक्षऱ्या करायला लावल्या आहेत ही धक्कादायक बाब आहे. या प्रकरणात मोठ्या रकमेची लाचही मागितली गेली असल्याचे वृत्त समोर आले आहे. महाराष्ट्राला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेला आरोपही खरा ठरला आहे. आता पोलिसांनी या प्रकरणाची स्वताहून दखल घेतली पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे असून या संदेशात त्यांनी गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांनाही टॅग केले आहे.