बारामती, (प्रतिनिधी) – बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांच्या एन्काऊंटर नंतर राज्यात राजकीय वातावरण तापले असून उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, गुन्हेगार हात बांधलेले असताना गोळी चालवतोच कसा ? एवढ्या पोलिसांसमोर त्याची हिंमत होते कशी ? सुदैवाने यामध्ये पोलिसाला गंभीर दुखापत झाली नसली तरी हे खूप गंभीर आहे. या संपूर्ण प्रकाराची चौकशी करावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
बारामती येथे आयोजित पत्रकार परिषदेत खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणीस यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, त्या नराधमाला फाशी मिळावी अशी माझी मागणी होती.
त्याला भर चौकात सर्वांसमोर फाशी द्यावी, अशी आमची मागणी होती. मात्र सोमवार (दि. 24) घटना घडली त्या घटनेची चौकशी झाली पाहिजे. त्याचा मृत्यू झाला ही वेगळी घटना आहे.
हा देश संविधानाने चालतो. सोमवारची जी घटना झाली त्याची चौकशी झाली पाहिजे, मला पोलिसांची काळजी वाटते. त्याचे दोन्ही हात बांधले आहेत तर त्याने पोलिसांवर हल्ला कसा केला.
याचे उत्तर गृहमंत्री यांनी द्यावे, तसेच या घटनेतून असे समोर येत आहे की, आज राज्यातील पोलीस सुरक्षित नाही. एखाद्या पोलिसांवर हल्ला होतो, ही यंत्रणा करते काय? या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे.
महिला अत्याचारासारख्या अत्यंत घाणेरडे कृत्य करणारा विरोधात जलद गती न्यायालयात खटले चालवून अशा नराधमांना भर चौकात सर्वांसमोर फाशी द्यायला पाहिजे. अशी माझी सरकारकडे आजही मागणी आहे. असे ही खासदार सुळे यावेळी म्हणाल्या.