मुंबई: नवी मुंबई विमानतळ स्वतंत्र नाही. हा मुंबई विमानतळाचा विस्तार आहे. त्यामुळे या आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाव असले पाहिजे, असे सांगतानाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनीच विमानतळाला शिवाजी महाराजांचे नाव दिले असते, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
राज यांच्या या भूमिकेनंतर आता राज्य सरकार काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय कृती समितीने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर चर्चा केली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळाबाबतची वस्तुस्थिती मांडली.
प्रशांत ठाकूर माझ्याकडे येऊन गेले. नवीन होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची त्यांची मागणी आहे. सरकारची भूमिका आहे बाळासाहेबांचे नाव देण्याची. त्याच्यातून हा संघर्ष सुरु आहे. मोर्चे, धरणं सुरु आहे. माझा पाठिंबा घेण्यासाठी ते आले होते.
मी वस्तूस्थिती समोर ठेवली. कोणतंही विमानतळ येतं, ते शहराबाहेर येतं. तेव्हाची मुंबई पकडली तर ते विमानतळ सांताक्रूझला गेलं. त्यावेळी मुंबई विकसित झालेली नव्हती. मग वाढवत ते सहारपर्यंत गेलं आणि मग त्याला सांताक्रुझ विमानतळ आणि सहार आंतरराष्ट्रीय विमानतळ नाव देण्यात आलं, असे राज म्हणाले.
मागे जेव्हा असे विमानतळ बनवायचे ठरले. तेव्हा जीव्हेके कंपनीला मी विचारले हे कसले विमानतळ आहे? त्यावर आताचे विमानतळ आहे ते डोमेस्टिक असेल, आणि ते विमानतळ आंतरराष्ट्रीय असेल. आता जे विमानतळ नवी मुंबईत होत असलं तरी ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरूनच टेक ऑफ होणार आहे. त्यासाठी शिवडी-न्हावाशेव रोड होत आहे. ते मुंबई आंतराराष्ट्रीय विमानतळ असल्यामुळेच त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव राहणार, असं कंपनीने मला सांगितलं होतं, असे त्यांनी सांगितले.
इथे जागा नसल्यामुळे नवी मुंबईत विमानतळ होत आहे. त्यामुळे त्या विमानतळालाही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव असेल असं मला वाटतंय. या विमानतळाला अजून पाच एक वर्ष लागतील, असं सांगतानाच हा वाद जाणीवपूर्वक होतोय की नाही याची मला कल्पना नाही, पण आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव राहणार आहे, असे ते म्हणाले. आज बाळासाहेब असते तर त्यांनीही विमानतळाला शिवाजी महाराजांचं नाव दिलं असतं, असे त्यांनी स्पष्ट केले.
नवी मुंबईतील विमानतळाला शिवाजी महाराजांचे नाव दिले तर आमचा विषयच संपला. आम्ही महाराजांच्या नावाला विरोध करणार नाही, असे कृती समितीने स्पष्ट केल्याचे राज म्हणाले. शिवाजी महाराजांच्या नावावर वाद होऊच कसा शकतो, असा सवालही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना केला.