वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे ः मंत्रालयात आढावा बैठक
वालचंदनगर – वन्य प्राण्यांचा जनतेला त्रास होऊ नये, यासाठी शेती कुंपण योजना मोठ्या प्रमाणात राबविणार आहे. शेतीच्या संरक्षणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. मंत्रिपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर मंत्रालयात आयोजित विभागाच्या पहिल्याच आढावा बैठकीत ते बोलत होते.
येणाऱ्या काळात वन विभाग अधिक लोकाभिमुख होण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. वन पर्यटनाला चालना देण्यासाठी विभाग प्रयत्नशील राहील. वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या अनुषंगाने संरक्षित क्षेत्रातील गावांचे पुनर्वसन करण्यात येत आहे. संरक्षित क्षेत्रातील 110 गावांपैकी 66 गावांचे पुनर्वसन झाले आहे. उर्वरित गावांचे लवकरच पुनर्वसन करण्यात येईल. पुनर्वसित गावांना तातडीने सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. वन्यजीव विभागाकरिता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे तातडीने भरणे आवश्यक आहे.
त्यासाठी प्रस्ताव सादर करा, वाघाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी कॉरिडॉर राखावा तसेच राज्य वन्यजीव मंडळाची तातडीने पुनर्रचना करावी, अशा सूचना वन राज्यमंत्र्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना केल्या.आदिवासी क्षेत्रातील पर्यटन स्थळाच्या विकासासाठी अधिक निधीची गरज आहे. त्यासाठी आपण पाठपुरावा करु. मृद संधारण कामांसाठी तसेच पर्यायी वनीकरण निधी व्यवस्थापन आणि योजना प्राधिकरणच्या निधीत वाढ करण्याची गरज आहे.
यावेळी वनमंत्री संजय राठोड, मुख्यमंत्र्यांचे तसेच वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्य वनसंरक्षक राम बाबू, प्रविण श्रीवास्तव, नितीन काकोडकर, एस. के. राव तसेच विभागाचे अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते. दरम्यान प्रधान सचिव विकास खारगे, नितीन काकोडकर, विरेंद्र तिवारी यांनी सादरीकरणाद्वारे विभागाच्या कामाची व योजनांची माहिती मंत्री व राज्यमंत्री महोदयांना दिली.