नगर – मंदिरे उघडण्यासाठी राज्यभर भाजपच्या वतीने घंटानाद आंदोलने चालू केली होती. राज्यातील सर्व दारूची दुकाने, मॉल्स, हॉटेल्स, व्यायाम शाळा, उद्याने सरकारने चालू केलेली होती, मात्र, मंदिरे उघडण्यासाठी भाजपने सुरू केलेले आंदोलन सरकारच्या जिव्हारी लागलेले होते. त्यामुळे मंदिरे उघडण्याचे श्रेय भाजपला जाऊ नये, यासाठीच सरकारने मंदिरे उशिरा उघडण्यास परवानगी दिली आहे. असा आरोप मध्य मंडल नगर शहर चे अध्यक्ष अजय चितळे यांनी केला आहे.
राज्य सरकारने मंदिरे उघडण्याच्या पार्श्वभूमीवर आज भाजप मध्य मंडलाच्या वतीने नालेगाव येथील सूर्यमुखी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर या ठिकाणी आरती करून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
देशात लॉकडाऊन झालेला होता, पण टप्प्याटप्प्याने केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने लॉकडाऊन उठवले होते. ज्या ठिकाणी गर्दी होते असे अनेक व्यवसाय उघडण्यास सरकारने परवानगी दिलेली होती, मात्र जनतेचा भावनिक विषय असलेला मंदिरे उघडण्याचा प्रश्न महाराष्ट्र सरकारने मुद्दाम प्रलंबित ठेवलेला होता असे ते म्हणाले.