कराड – कराड-विटा मार्गावर सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास सर्वपक्षीय आंदोलकांनी एकत्र येत खड्ड्यांमध्ये झाडे लावून आंदोलन केले. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याची 15 ऑगस्टपर्यंत दखल न घेतल्यास तहसील कार्यालयावर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला.
यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, डॉ. योगेश कुंभार, बाबरमाची ग्रामपंचायत सदस्य अधिक पाटील, सदाशिवगड रिक्षा युनियनचे अध्यक्ष विनोद डुबल, सचिन जगताप, अरुण डुबल, उमेश माने, बाबू माने यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.
कराड-विटा मार्गावर ओगलेवाडी ते सुर्ली घाट यादरम्यान ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे रस्त्याचे वाटोळे झाले आहे. या रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले आहेत. त्यामुळे येथे छोटे-मोठे अपघात होत आहेत. यावर प्रशासनाने लक्ष घालून हे खड्डे डांबरीकरण करून बुजवून घ्यावेत. अन्यथा 15 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयावर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. येथील खड्ड्यांमध्ये आंदोलनकर्त्यांनी झाडे लावून ठेकेदाराचा निषेध केला.
प्रशांत यादव म्हणाले, कराड-विटा मार्ग वाहतूक दृष्टीने महत्त्वाचा आहे. ओगलेवाडी ते सुर्ली घाट यादरम्यान ठेकेदाराच्या कामचलाऊ धोरणामुळे रस्त्याची वाट लागली. या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असून येथे छोटे-मोठे अपघात घडू लागले आहेत. प्रशासनाने याची दखल घेऊन संबंधित ठेकेदाराला हे खड्डे मुजवण्याचे आदेश त्वरित दिले पाहिजेत. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज या खड्ड्यांमध्ये झाडे लावली आहेत. 15 ऑगस्टपर्यंत या खड्ड्यांची दखल घेतली नाही तर तहसील कार्यालयात आमरण उपोषण करण्यात येणार आहे. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर त्याची दखल घ्यावी, अशी मागणी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केले आहे.