वाघोली – लेखी आश्वासन मिळत नाही तो पर्यंत आंदोलन व उपोषण सुरुच राहणार असल्याचा निर्धार हवेली तालुका भाजप अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी केला आहे. भामा आसखेड पुनर्वसन बाधित जमिनीवरील पुनर्वसनाचे शेरे निघावेत म्हणुन दि. २ रोजी पेरणे फाटा येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले असून यात संदीप भोंडवे, प्रसाद घेनंद व चक्री उपोषण साठी शेकडो शेतकरी बसलेले आहेत.
भाजपाचे पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, दादासाहेब सातव, सुदर्शन चौधरी, अमोल शिवले, भगवानराव शेळके, कैलास सोनवणे, वैजयंती चव्हाण, बाळासाहेब चौधरी, शिवसेना नेते स्वप्निल कुंजीर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पुणे जिल्हा भाजपाच्या वतीने पाठींबा दर्शविला. तसेच आखिल भारतीय मराठा महासंघ पुणे जिल्हाअध्यक्ष गुलाब गायकवाड, दादा भोंडवे, पुणे जिल्हा कायदा आघाडीचे अध्यक्ष अॅड. संजय सावंत, महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष, रयत शेतकरी संघटना, प्रहार संघटना महाराष्ट्र राज्य, राष्ट्रीय समाज पक्ष यांनी पाठींबा व्यक्त केला आहे.
कृती समितीची कोअर टीम त्यामध्ये प्रदीपदादा कंद, अॅड. धर्मेंद्र खांडरे, श्रीहरीदादा कोतवाल, अंकुश कोतवाल, उत्तमराव भोंडवे, विकास कोतवाल, सुखदेव भोरडे, संभाजी ढमढेरे यांनी पुनर्वसन आयुक्त उत्तमराव पाटील, विभागीय उपायुक्त सुहास जोशी व विभागीय आयुक्त सौरव राव यांच्याशी भेट घेऊन पुनर्वसनाचे शेरे काढण्यासंदर्भात चर्चा केली.
हवेली तालुक्यातील १६ गावांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडुन स्वाक्षरी करुन आल्याची माहिती पुनर्वसन अधिकारी उत्तमराव पाटील यांनी कृती समितीच्या सदस्यांना दिली असुन व लवकरच पुनर्वसनाचे शेरे काढण्यासंदर्भात प्रक्रिया सुरु होईल असे आश्वासन दिले.
कृती समितीच्या सदस्यांनी पुनर्वसनाचे शेरे काढण्यासंदर्भात जो पर्यंत ठोस लेखी आश्वासन मिळत नाही तो पर्यंत आंदोलन व उपोषण सुरुच राहील असे विभागीय आयुक्त सौरव राव यांना सांगितले. त्यांनी मी स्वतः लक्ष घालुन प्रक्रिया करुन घेतो असे कृती समितीच्या सदस्यांना सांगितले.