वॉशिंग्टन – भारतीय सीमेवर चिनी सैन्याने केलेल्या घुसखोरीची दखल घेऊन अमेरिकेतील दोन्ही पक्षातील 9 विशेष प्रभावी खासदारांच्या गटाने अमेरिकेतील संसदेच्या प्रतिनिधीगृहामध्ये एक ठराव मांडला आहे. या ठरावानुसार सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी बळाचा वापर न करता उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या यंत्रणेचा वापर करावा, अशी मागणी चीनला करण्यात आली आहे.
पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अनेक भागात भारत आणि चीनचे सैन्यामध्ये 5 मे पासून कोंडी निर्माण झाली आहे. गेल्या महिन्यात गलवान खोऱ्यामध्ये झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचे 20 जवान शहिद झाले होते.
चीनने सीमेजवळ 5 हजार सैनिक जमा केले होते. तणाव कमी करण्यासाठी लष्करी अधिकाऱ्यांच्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या लष्करी तणावाला चीनची आक्रमक भूमिकाच जबाबदार असून केवळ भारताच्या सीमेवरच नाही, तर भूतान, दक्षिण चीन समुद्र, सेन्काकू बेटांवर, हॉंगकॉंग आणि तैवानमध्येही चीनची आक्रमकता दिसून येते आहे. त्यामुळे चीनने बळाचा वापर न करता उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या यंत्रणेद्वारे तणाव कमी करावा, अशी मागणी करणारा ठराव या खासदारांनी केला आहे.
भारतीय वंशाचे अमेरिकेतील खासदार राजा कृष्णमूर्ती आणि रो खन्ना आणि फ्रॅंक पॅलोन, टॉम सुझ्झी, टेड योहो, जॉर्ज होल्डिंग, शीला जॅक्सन-ली, हेली स्टीव्हन्स आणि स्टीव्ह चाबोट या अन्य भारतीय-अमेरिकन खासदारांनी हा ठराव मांडला आहे. होल्डिंग आणि ब्रॅड शर्मन यांच्या नेतृत्वात आणि इतर सात सदस्यांनी या ठरावावर अनुमोदनाची स्वाक्षरी केली आहे.
गेल्या आठवड्यात, सिनेटच्या परराष्ट्र संबंध समितीचे रॅंकिंग सदस्य, बॉब मेनंडेझ यांनीही भारत-अमेरिकेतील भागीदारीचा हवाला देऊन चीनला आंतरराष्ट्रीय निकषांचा मान राखायला आणि वाद सामोपचाराने सोडवण्याचे आवाहन केले होते.
भारताच्या सीमेवर आणि जगात अन्यत्रही चीनच्या आक्रमक भूमिकेमुळे चिंता व्यक्त करावी लागते आहे. असेही या ठरावामध्ये म्हटले आहे. रिपब्लिकन सिनेटचे सदस्य मार्को रुबीओ यांनी नुकतेच अमेरिकेत भारताचे राजदूत तरनजितसिंग संधू यांना भेटून भारतीय नागरिकांबद्दलच्या सहभावना व्यक्त केल्या.