नगर – अतिवृष्टीने नगर जिल्ह्यातील बहुतेक गावांत शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, शेतकऱ्यांनी धीर सोडू नये. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत दिवाळीपूर्वी भरीव मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न असेल, अशी भूमिका पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मांडली. परतीच्या पावसाने नगर जिल्ह्यात दाणादाण केली आहे.
त्यात शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल आहेत. त्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज पालकमंत्री मुश्रीफ यांनी नगर जिल्ह्यातील पाथर्डी व शेवगाव या दोन तालुक्यांमधील गावांची निवड केली होती. या विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या आमदार मोनिका राजळे प्रतिनिधित्व करतात.
शेवगाव तालुक्यातील लाडजळगाव, आंतरवली व शिंगोरी तसेच बोधेगाव पट्ट्यातील नुकसानग्रस्त शेतीची आज पालकमंत्री मुश्रीफ यांनी पाहणी केली. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी पालकमंत्र्यांकडे व्यथा मांडल्या. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने आता काय करावे? अशी आर्त हाक शेतकऱ्यांनी दिली. दरम्यान, धीर धरा. सरकार तुमच्या पाठिशी आहे. तुमची दिवाळी गोड होईल, अशी ग्वाही पालकमंत्री मुश्रीफ यांनी भेट घेणाऱ्या शेतकऱ्यांना दिली.