कऱ्हेवरील बंधाऱ्याच्या विद्रुपतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
सासवड – पुरंदर तालुक्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे मुख्यनदी असलेल्या कऱ्हा नदीला महापूर आला होता. पुरामध्ये नदीपात्रालगतची मोठमोठी झाडे उन्मळून पडली. ती वाहून येत ठिकठिकाणच्या बंधाऱ्यांत अडकल्याने पाणी पुढे जाण्यास अडथळा निर्माण होत असून अद्यापही ती नदीपात्रातून काढण्यात आलेली नाहीत. सर्वच प्रशासन याकामी एकमेकांकडे बोट दाखवित आहे.
सासवड शहरातील संगमेश्वर येथील बंधाऱ्याजवळ कऱ्हा व चांबळी नदीचा संमग होतो. या ठिकाणाला संगमेश्वर असे नाव असून या दोन्ही नद्यांच्या संगमावर मोठा बंधारा आहे. याव बंधाऱ्यात मोठी झाडे तसेच कचरा अडकून पडला आहे. सासवड नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती, लघुपाटबंधारे विभाग, जलसंधारण व जलसंपदा विभाग या विभागांपैकी नदीपात्र स्वच्छ करण्याची जबाबदारी कोणाची, असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबतीत टोलवाटोलवी सुरू आहे.
सासवड नगरपालिका हद्दीत बंधारा असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग ही जबाबदारी सासवड नगरपालिकेवर ढकलू पाहत आहे. तर नगरपालिकेकडून पंचायत समितीच्या लघु पाटबंधारे विभागाकडे बोट दाखविले जात आहे. तर, पाटबंधारे विभागाकडून ही जबाबदारी जलसंपदा व जलसंधारण खात्याची असल्याचे सांगितले जात आहे.
प्रशासनाच्या या टोलवाटोलवीमुळे हा कचरा गेली दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ नदीपात्र तसेच बंधाऱ्यात अडकून पडला आहे. सासवड शहराची धार्मिक ओळख सांगणाऱ्या संगमेश्वर मंदिरालगतच्याच बंधाऱ्याची अशी स्थिती असल्याने हे चित्र विद्रूप दिसत आहे. यातून या ठिकाणी आलेले पर्यटक नाराजी व्यक्त करीत असून प्रशासनाने याची गंभीर दखल घेणे गरजेचे ठरत आहे.