नारायणगाव -बाह्यवळण रस्त्यांची कामे लवकर सुरू व्हावी यासाठी दिल्लीत आशिष शर्मा व आलोक या आयएएस अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेरीस राजगुरूनगर, मंचर, कळंब आणि आळेफाटा येथील बाह्यवळण रस्त्यांच्या कामांच्या निविदा प्रक्रियेस मंजुरी मिळाली. निविदांची मुदत राजगुरुनगर व मंचरसाठी 2 मार्च तर कळंब आणि आळेफाटाकरिता 17 मार्चपर्यंत आहे. त्यानंतर तांत्रिक व आर्थिक बाबींची छाननी होऊन जूनच्या अखेरीपर्यंत प्रत्यक्ष कामास सुरूवात होणार आहे, अशी माहिती शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.
मोशी ते चांडोलीच्या भूसंपादनाची प्रक्रिया दोन महिन्यांत
बाह्यवळणांनंतर नाशिक फाटा ते चांडोली या टप्प्यास प्राधान्य देणार आहे. पिंपरी- चिंचवड हद्दीतील भूसंपादनाचे क्षेत्र ताब्यात येण्यास लागणारा विलंब लक्षात घेऊन या महामार्गाचे नाशिक फाटा ते मोशी (इंद्रायणी नदीपर्यंत) आणि मोशी ते चांडोली असे दोन भाग केले आहेत. त्यानुसार मोशी ते चांडोली या टप्प्याच्या भूसंपादनाची प्रक्रिया 2 महिन्यांत पूर्ण करून देण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहे. दरम्यान, सहापदरीकरणासाठीची 80 टक्के जमीन महामार्ग प्राधिकरणाच्या ताब्यात येताच या कामाच्या निविदा प्रक्रिया सुरू करण्यास मंजुरी मिळावी, यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांनी सांगितले.
बाह्यवळण रस्त्यांची कामे मार्गी लावून वाहतूक कोंडीतून जनतेची सुटका करावी, यासाठी काही महिने सातत्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, जिल्हाधिकारी, भूसंपादन अधिकारी यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांच्या आढावा बैठका घेत आहे. महामार्गावरील 6 बायपासपैकी नारायणगाव आणि खेड घाटाचे बाह्यवळण रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मार्चअखेरपर्यंत दोन्ही रस्त्यांवरील एक मार्गिका तात्काळ सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कंत्राटदाराला दिले आहेत.