कराड – कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाशी माझे कधीच मतभेद नव्हते आणि असण्याचे कारणही नाही. विधान परिषदेच्या निवडणुकीच्या काळात काही घटना घडल्या. त्याबाबत मी अनेकदा बोललो आहे. त्या काळात ठरावीक लोकांनी माझ्याबद्दल गैरसमज निर्माण केले. त्यावरून पक्षाने माझ्यावर कारवाई केली, असे मत विधान परिषदेतील अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केले. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याची कारवाई चुकीचीच आहे, असेही ते म्हणाले.
आ. सत्यजित तांबे यांनी सोमवारी दुपारी कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधिस्थळी अभिवादन केले. युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. त्याप्रसंगी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.
आ. तांबे म्हणाले, आम्ही पिढ्यान्पिढ्यापासून कॉंग्रेसचे काम करत आहोत. आमच्या परिवाराला कॉंग्रेसमध्ये 100 वर्षे होत आहेत. विद्यार्थी व युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून मीदेखील 22 वर्षे पक्षात खर्च केली आहेत; परंतु आमच्यातल्या ठरावीक लोकांनी माझी पक्षातून हकालपट्टी होण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या विरोधात आमची लढाई होती, ती अजूनही सुरू आहे. माझी नाराजी दूर व्हायला, मला आधी चर्चेला बोलावले पाहिजे. चर्चा झाल्यास नाराजी दूर होईल. राहुल गांधींवर झालेली कारवाई चुकीचीच आहे, असे त्यांनी सांगितले.
युवकांच्या आत्महत्यांचा प्रश्न गंभीर
एका प्रश्नाला उत्तर देताना, आ. तांबे म्हणाले, महाराष्ट्रात बेरोजगारीचा प्रश्न भेडसावत आहे. उच्चशिक्षण घेणाऱ्या युवकांना नोकरी, व्यवसायासाठी पुणे, मुंबईलाच जावे लागते. परिस्थितीमुळे युवकांना नैराश्य येथे. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विषय गंभीरच आहे. आता युवकांच्या आत्महत्यांचाही प्रश्न गंभीर आहे.