– एन. आर. जगताप
अन्न व औषध प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या कारवाया नेमक्या कधी होतात, त्या कधी केल्या जातात, कोणते अधिकारी कारवाई करतात, केलेली कारवाई ही दंडात्मक असते की फौजदारी, हेच नेमकं समजत नाही.
तालुक्यात चायनीज दुकानांचे पेव फुटले आहे. या दुकानांवर कोणत्याही प्रकारचे बंधन राहिलेले नसून अतिशय घातक रसायने असलेल्या मसाले यांचा वापर केला जात असून, चायनीज दुकानांमध्ये वापरले जाणारे चिकन हे अतिशय हलक्या दर्जाचे असते. तसेच ते खरच ताजे असते का, या बाबतीतही शंका उपस्थित केली जात आहे. केवळ जिभेचे चोचले पुरवण्यासाठी उभ्या केलेल्या या चायनीज दुकानांमध्ये वापरले जाणारे पाणी, भाजीपाला व चिकन हे खरंच स्वच्छ व शुद्ध असते का, तसेच अन्न व औषध प्रशासनाचे सर्व नियम पाळणारे खाद्यपदार्थ या दुकानांमधून विक्रीस ठेवले जातात का याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.
सर्व नियम व कायदे धाब्यावर बसवून सध्या तालुक्यात चायनिज गाड्यांचे धंदे जोरात चालू आहे आणि याकडे आरोग्य अधिकाऱ्यांचीही कानाडोळा करण्याचे प्रकार सध्या चालू असल्याचे दिसून येत आहे. या गाड्यांमुळे तालुक्यात मोकाट कुत्र्यांची संख्याही वाढते आहे. तालुक्यात या कुत्र्यांमुळे रात्री सातनंतर घराबाहेर पडणे मुश्कील होत आहे. चहा विक्री करणारे हॉटेल, हातगाड्या, छोटे स्टॉल यांच्यावर अन्न व औषध प्रशासनाने धाडी टाकून खाद्यपदार्थांचे चहाचे व पाण्याचे नमुने तपासायला हवेत. हॉटेलमधील किचन स्वच्छ असते का यावरही संशोधन होणे गरजेचे आहे. वडापाव विक्री करणाऱ्यांकडील तेल कित्येक महिन्यांपूर्वीचे एकाच कढईत एकाच डब्यात साठवलेले असते. हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगारांची वेळेच्या वेळेवर आरोग्य तपासणी केली जात नाही.