82 वर्षीय वडिलांची उपचारासाठी 12 तास वणवण व्यर्थ
वैद्यकीय क्षेत्राचा असंवेदनशीलतेचा कळस!
पुणे – पोटच्या गोळ्याला अचानक त्रास होऊ लागल्याने त्याच्या उपचारासाठी तब्बल 12 तास शहरात वणवण फिरण्याची वेळ 82 वर्षीय पित्यावर आली. अखेर दिवसभर उपाशीपोटी फिरून या नागरिकाने आपल्या मुलाला ससूनमध्ये दाखल केले. मात्र, तोपर्यंत वेळ निघून गेल्याने या पित्याची धडपड व्यर्थ ठरली. खासगी रुग्णालयांनी दाखवलेल्या असंवेदनशीलतेमुळे विजय गोसावी या 42 वर्षीय व्यक्तीला प्राण गमवावा लागला आहे.
महादेव राजेंद्र गोसावी रा. आपटे कॉलनी, सिंहगड रस्ता असे या पित्याचे नाव आहे. त्यांचा मुलगा विजय यांना काही दिवसांपासून ताप आणि घशात दुखत होते. सोमवारी पहाटे त्यांना श्वास घेण्यास त्रास सुरू झाला, तसेच त्यांना काही खाता येत नव्हते. त्यामुळे वडिलांनी त्यांना सिंहगड रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयात नेले. मात्र, उपचाराची यंत्रणा नसल्याचे सांगत या रुग्णालयाने विजयला उपचारासाठी दाखल करून घेण्यास नकार दिला. हे पिता-पुत्र तेथून एरंडवणा भागातील एका मोठ्या खासगी रुग्णालयात गेले. तेथे मुलाचा होणारा त्रास पाहून या हॉस्पिटलने रुग्णाला बेड दिला. त्यानंतर विजय यांच्या पत्नीला “25 हजार डिपॉझिट आणि आयसीयूचे दररोजचे 15 हजार रु. भाडे होईल,’ असे सांगत तातडीने पैसे भरण्यास सांगितले.
मात्र, “आता पैसे नाहीत एक-दोन दिवसांत तजवीज करतो’ असे महादेव गोसावी यांनी सांगितले. त्यानंतर अचानक रुग्णालय प्रशासनाने विजय यांच्या पत्नीला कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास सांगत “रुग्णासाठी बेड नाही, त्यामुळे तातडीने घेऊन जावे,’ असे सांगितले. यावर या पित्याने सामाजिक कार्यकर्ते अविनाश खंडारे आणि एका नातेवाईकाशी चर्चा करून त्यांनी काही रुग्णालयात बेड असल्याची माहिती मिळवली. त्यानंतर त्यांनी विजय यांना ऍम्बुलन्समधून कात्रज येथील एका खासगी रुग्णालयात नेले. पण, तेथील डॉक्टरांनी रुग्णाचे वडील आणि ऍम्बुलन्स चालकावर आरडाओरडा केला. “रुग्ण आमच्याकडे कसा आणला’ अशी विचारणा केली. त्यानंतरही महादेव गोसावी डॉक्टरांना विनवण्या करत होते. मात्र, काहीही न ऐकता या डॉक्टरांनी विजय यांना पुन्हा ऍम्बुलन्समध्ये ठेवले.
येथेही उपचार न मिळाल्याने गोसावी यांनी जवळच्या एका मोठ्या खासगी रुग्णालयात मुलाला नेले. मात्र, तिथेही बेड नसल्याचे सांगत त्यांना ससून रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथे विजय यांना रात्री नऊच्या सुमारास दाखल करून घेतले, मात्र मंगळवारी सकाळी विजय यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे तब्बल 12 तास मुलाला जगवण्यासाठी महादेव गोसावी यांनी केलेली धडपड व्यर्थ गेली.
अधिकारी, डॉक्टरांची माणूसकी संपली!
या 12 तासांच्या कालावधीत गोसावी यांनी अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांना फोन केले. त्यात महापालिका आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांनाही फोन केला. मात्र, त्यांचा कोणाशी संपर्क झाला तर कोणाशी नाही. तर, ज्या-ज्या खासगी रुग्णालयांत महादेव गोसावी मुलाला घेऊन गेले, तिथेही त्यांनी डॉक्टरांना विनवण्या केल्या. मात्र, कोणीही त्यांना प्रतिसाद दिला तर नाहीच, तर उपचाराची तयारीही दाखविली नाही. त्यामुळे “गरीब असलो म्हणून आम्ही उपचाराविनाच मरायचे का’ असा थेट सवाल महादेव गोसावी यांनी उपस्थित केला आहे. तसेच माझ्यासोबत जे झालं, ते इतर कोणत्याही बापासोबत होऊ नये,’ अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.