पुणे(प्रतिनिधी) – दारु आणि जेवणाच्या बिलाचे पैसे दिले नाहीत, म्हणून डांबून ठेवलेले तीन मित्र पळून जात असताना झालेल्या मारहाणीत एकाचा खून झाल्या प्रकरणी एकाला मुंबई उच्च न्यायालयाने 25 हजाराचा जामीन मंजूर केला. संबंधित आरोपीला अटक करुन चार वर्षे झाली. तरीही अद्याप आरोप निश्चिती करण्यात आलेली नाही. आरोपीला त्याच्या वैयक्तिक स्वातंत्र्यापासून वंचित ठेवता येणार नाही, असे नमूद उच्च न्यायालयाने हा आदेश दिला. न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी हा निकाल दिला.
कामशेत येथील बब्बी दा ढाबा येथे आठ ऑक्टोबर 2016 रोजी हा प्रकार घडला. चंद्रशेखर गौतम साही ( वय – 50 रा. मीरागंज, बिहार) याला जामीन मंजूर करण्यात आला. बचाव पक्षातर्फे ऍड. सचिन ठोंबरे यांनी कामकाज पाहिले.
संबंधित गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असला तरी याप्रकरणात अद्यापपर्यंत आरोप निश्चिती करण्यात आलेली नाही. आरोपी गेली चार वर्षे जेलमध्ये आहे. त्याला घटनेच्या कलम 21 नुसार वैयक्तिक स्वातंत्र्यापासून वंचित ठेवता येणार नाही, असा युक्तीवाद ऍड. ठोंबरे यांनी केला.
याप्रकरणी प्रशांत दत्तात्रय साष्टे ( वय – 23 रा. जुनी सांगवी) यांनी कामशेत पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. चंद्रशेखर साही याच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल आहे. संग्राम उर्फ बंटी संजय इथापे ( वय – 25 रा. गुरुव पिंपळे, जवळकरनगर, काशीद कॉलनी) याचा खून करण्यात आला.