डॉ. प्रकाश पांढरमिसे यांचे प्रतिपादन
वानवडी – छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जसा ढाल-तलवारीचा आहे तसाच तो शौर्य, धैर्य, औदार्य, समता, न्याय, बंधुता, स्त्रीसन्मानाचा आणि समाज परिवर्तनाबरोबरच आत्मसन्मानाचा आहे. राजा होण्यासाठी लढाया जिंकाव्याच लागतात; परंतु लोककल्याणकारी जाणता राजा होण्यासाठी रयतेची पोटच्या लेकराप्रमाणे काळजी घ्यावी लागते. ती शिवाजी महाराजांनी घेतली होती. स्वराज्यातील रयतेच्या बारीक सारीक गोष्टींची जाण, भान त्यांना होती म्हणूनच त्यांना “जाणता राजा’ ही सर्वात मोठी बिरुदावली बहाल केली गेली, असे प्रतिपादन बावडा येथील श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयातील इतिहास विभागप्रमुख डॉ. प्रकाश पांढरमिसे यांनी केले.
डेक्कन जिमखाना पुणे येथील मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत बहिःशाल शिक्षण मंडळाच्यावतीने डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यान मालेत छत्रपती शिवराय आणि आजची तरुणाई, या विषयावरील व्याख्यानात डॉ. पांढरमिसे बोलत होते.
सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक बहिःशाल विभाग समन्व्यक प्रा. प्रवीण कड यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य एस. एम. एडके होते. कार्यक्रमाला विभाग प्रमुख डॉ. एस. एस. पोखरणा, प्रा. माधुरी पवार, प्रा. विजया कांबळे, डॉ. संदीप अनपट, डॉ. लोपेज, प्रा. अमोल चौधरी, प्रा. प्रमोद सपकळ उपस्थित होते. प्रा. गंगणे यांनी आभार मानले.