नवी दिल्ली – अरुणाचल प्रदेशामधून चिनी सैन्याने अपहरण करूण आपल्या मुलाला विजेचे शॉक दिले. त्याला मारहाण करण्यात आली असे आरोप त्याच्या वडिलांनी केले आहेत.
अरुणाचल प्रदेशातून चिनी सैन्याने कथितरित्या अपहरण केलेल्या या मुलाला त्यांच्या कुटुंबाकडे सोपवण्यात आले आहे. जिल्हा उपायुक्त शाश्वत सौरभ यांनी सांगितले की, भारतीय सैन्याने सोमवारी संध्याकाळी अप्पर सियांग जिल्ह्यातील तुटिंग येथे झालेल्या एका समारंभात मिराम तोरणला त्यांच्या पालकांकडे सोपवले. मायदेशी परतल्यावर स्थानिक प्रशासन आणि पंचायत नेत्यांनी त्यांचे स्वागत केले.
17 वर्षीय मीरामचे चिनी सैन्याने 18 जानेवारी रोजी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील लुंगटा जोर भागातून अपहरण केले होते. तो त्याचा मित्र जॉनी यंगसोबत शिकारीला गेला होता. जॉनी येउंग घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला आणि त्याने ही बाब अधिकाऱ्यांना कळवली. चिनी सैन्याने 27 जानेवारी रोजी अंजाव जिल्ह्यातील किबिथू येथील वाचा-दमई संपर्क बिंदूवर मिरामला भारतीय लष्कराकडे सुपूर्द केले, जिथे त्याला वेगळे ठेवण्यात आले आणि कायदेशीर औपचारिकता पूर्ण केली.
मीरामचे वडील ओपांग तोरण म्हणाले की, त्यांचा मुलगा मानसिकदृष्ट्या खचला होता कारण या संपूर्ण घटनेने तो घाबरला होता. एका आठवड्यापेक्षा जास्त वेळ चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या ताब्यात असताना त्याला बांधून ठेवत त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधण्यात आली होती असा आरोप वडिलांनी केला आहे. तो अजूनही धक्क्यामध्ये आहे.
त्याला पाठीत लाथ मारण्यात आली होती आणि सुरुवातीला त्याला विजेचा सौम्य धक्का देण्यात आला होता. त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली गेली होती आणि त्याचे हात बांधलेले होते. जेव्हा जेवणाची वेळ व्हायची तेव्हाच त्याचे हातपाय सोडले जायचे. पण, त्यांनी त्याला पुरेसे अन्न दिले, असे मीरामच्या वडिलांनी सांगितले.