पुणे – पुण्यातील एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल केलेल्या विधानावरून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. यावर एल्गार परिषदेमध्ये करण्यात आलेले वक्तव्य योग्य नसल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
वडगाव बुद्रुक येथे विभागाच्या इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रम झाला. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
अजित पवार म्हणाले कि, एल्गार परिषदेमध्ये करण्यात आलेले वक्तव्य योग्य नाही. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी चौकशी करत आहेत. भाषण करताना तारतम्य ठेवून भाषण करायला पाहिजे. ते भाषण ताबडतोब थांबवायला पाहिजे होते, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, शरजील उस्मानीवर पुण्यातील स्वारगेट पोलीस स्थानकात चिथावणीखोर वक्तव्य केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वारगेट पोलीस स्थानकाच्या हद्दीत गणेश कला क्रीडा रंगमंच या ठिकाणी शनिवारी एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.