वाल्हे (दि.०३) पुणे- पंढरपूर पालखी महामार्गावरील, पुणे-मिरज लोहमार्गावर, वाल्हे – नीरा दरम्यानचे, थोपटेवाडी (ता.पुरंदर) हद्दीतील, रेल्वे फाटक क्रमांक २७ किलोमीटर ७९/०१ रेल्वेगेट सोमवार (दि.०३) सकाळी ७ ते बुधवार (दि.५) सकाळी ७ पर्यंत (४८ तास) वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या वतीने, प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली होती.
या संदर्भातील वृत्त ‘दैनिक प्रभात’ ने रविवारी प्रसिद्ध करून ऐन सणासुदीच्या काळात हा रस्ता बंद होणार असल्याने लोकांची व्यथा मांडली होती. याची दखल स्थानिक प्रशासनाने घेत परवानगी नाकारल्याने हे काम आज रद्द झाले असल्याची माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दै. प्रभात’ ला दिली आहे. त्यामुळे दसरा सणांच्या निमित्ताने गावी जाणाऱ्या प्रवाशांचा ४० किलोमीटरचा वळसा टळला आहे.
मागील तीन महिन्यात हा रस्ता पुणे-मिरज रेल्वे लाईनच्या कामामुळे थोपटेवाडी (ता.पुरंदर) येथील गेट नंबर २७ किलोमीटर ७९/०१ हे तीन वेळा बंद ठेवण्यात आला होता. पंढरपूरच्या एकादशीच्या आधी दोन दिवस तसेच गणेशोत्सवाआधी दोन दिवस बंद ठेवल्याने प्रवाशांना चाळीस किलोमीटरचा वळसा घालून ये – जा करावी लागत होती.या वेळीही रेल्वे प्रशासनाने पुन्हा दसऱ्याचा मुहूर्त साधून दसरा सणांच्या आधी दोन दिवस पालखी महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र, दैनिक ‘प्रभात’ ने रविवारी याबाबत सडेतोड वृत्त दिल्याने स्थानिक प्रशासनाने रेल्वेला हे काम करण्यास परवानगी न दिल्याने, आज सोमवारी सकाळी सात पासून सुरू होणारे काम सुरू न करता पुढील काळात या कामाचे नियोजन केल्याचे रेल्वे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली आहे.
या पालखी महामार्गावरून नवरात्रीच्या या तीन दिवसांत पुणे, मुंबई, नाशिक व राज्यभरातून चाकरमानी आपल्या मुळगावी दसरा सण साजरा करण्यासाठी जात असतात. मात्र जेजुरी ते नीरा दरम्यानचा पालखी मार्ग रेल्वेने बंद ठेवल्याने या प्रवाशांना मोठा वळसा घालून जावे लागणार होते. जेजुरी येथून मोरगाव व पुन्हा नीरा येथे येऊन पुढील प्रवास करावा लागणार होता. त्यासाठी तब्बल ४० किलोमीटरचा वळसा या मार्गावरील प्रवाशांना पडणार होता, तो आता टळल्याने स्थानिक प्रवाशांनी दैनिक ‘प्रभात’ चे आभार मानले.