मुंबई: ज्या नराधमाने हिंगणघाटमधील युवतीवर वेळ आणली त्याला कडक शासन होईल, असा विश्वास राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. हिंगणघाटमधील त्या युवतीची आज मृत्यूशी झुंज संपली. त्यावर बोलताना जयंत पाटील यांनी अशा नराधमांना कठोर शासन करण्याचे संकेत दिले आहेत.
हिंगणघाटमधील युवतीवर ज्या नराधमाने ही वेळ आणली त्या नराधमाने कडक प्रायश्चित्त करावं ही महाराष्ट्रातील जनतेची अपेक्षा आहे. त्यामुळे त्या नराधमावर कडक कारवाई केली जाईल असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला. अशी मानसिकता महाराष्ट्रातील कोणातही असू नये यासाठी जरब बसली पाहिजे असेही जयंत पाटील म्हणाले.
मागच्या काळात अशा गंभीर दोन-तीन घटना घडल्या आहेत अशा मानसिकतेला अद्दल घडवण्याची गरज आहे त्यामुळे हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधमावर सरकारकडून कडक कारवाई होईल अशी अपेक्षाही जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
हिंगणघाट येथे घडलेल्या घटनेमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या भावनांचा उद्रेक झाला आहे. सरकार व न्याय व्यवस्था मिळून दोषींना कठोरात कठोर शिक्षा करणार, मात्र जनतेने शांतता राखावी आणि सरकारला सहकार्य करावे अशी विनंती त्यांनी केली आहे.