नवी दिल्ली – करोना विषाणुंवर विकसित करण्यात आलेल्या लसीच्या चाचण्यांची प्रक्रिया येत्या 15 ऑगस्टच्या आत पुर्ण करा असा लेखी आदेश इंडियन कौन्सिल फॉर मेडिकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआरने, काढला होता. त्यावर आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींनी तसेच राजकीय क्षेत्रातील काहींनी जोरदार टीका केली होती.
वैज्ञानिक प्रयोगांसाठी असे घाईगर्दीचे कालबंधन घालणे धोक्याचे आहे असे त्यांनी म्हटले होते तर पंतप्रधानांच्या पंधरा ऑगस्टच्या भाषणासाठी ही घाई केली जात असल्याची टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी केली होती. त्यावर आता आयसीएमआरने सारवासारव केली आहे. केवळ लाल फितीच्या कारभाराचा फटका या संशोधनाला बसू नये आणि त्यातील नाहक दिरंगाई टाळली जावी याच उद्देशाने हे आदेश दिले गेले होते असे आता आयसीएमआरने म्हटले आहे.
करोनाच्या काळात लोकांपर्यंत ही लस त्वरेने पोहचण्यासाठीच ही धडपड असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारतात तयार करण्यात आलेल्या कोवॅक्सिन या औषधांच्या चाचण्या घेण्यासाठी देशातील बारा प्रयोगशाळांची निवड करण्यात आली असून त्यांना आयसीएमआरचे प्रमुख डॉ बलराम भार्गव यांनी 2 जुलै रोजी पत्र पाठवून ही सुचना केली होती. यात या सुचनेचे पालन न करणाऱ्या प्रयोगशाळांची गंभीर दखल घेण्यात येईल असा स्पष्ट इशारा देण्यात आला होता. त्यावरून अनेकांनी या घिसाडघाईबद्दल संताप व्यक्त केला आहे.
वैद्यकीय सुरक्षेशीच ही छेडछाड करण्याचा प्रयत्न आहे असे या क्षेत्रातील काही तज्ज्ञांनी म्हटले आहे. संशोधन कार्यासाठी अशी कालमर्यादा घालणे अशास्त्रीय असल्याचीही टीका होत होती. तथापी या लसीच्या चाचण्यांबाबत पुरेशी दक्षता व वैद्यकीय सुरक्षा घेतली जात असून त्यात सर्व शास्त्रीय निकष पाळले जातील असे आयसीएमआरने म्हटले आहे.
भारत बायोटेक आणि पुण्याच्या राष्ट्रीय विषाणु संस्थेने ही लस विकसित केली असून त्याच्या प्राथामिक टप्प्यातील चाचण्यांच्या निष्कर्षांनाही अजून मान्यता मिळायची आहे.