प्रभात प्रभाव
अहमदनगर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ज्या महिला शिक्षकांना सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष म्हणून नेमणुकीचे आदेश देण्यात आले आहेत, ते सर्व आदेश बदलून त्यांच्या जागी पुरुष शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात येणार आहेत, आसे आश्वासन जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी, जिल्हा उपनिवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील व निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधीनींना दिले आहे. दैनिक प्रभातने याविषयावर प्रकाश टाकत लक्ष वेधले होते. त्यानंतर हे आश्वासन देण्यात आले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी यंदा प्रथमच महिला शिक्षिकांना सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष नेमणुकीचे आदेश देण्यात आले आहेत. सदरचे काम जोखमीचे व महिलांसाठी गैरसोयीचे असल्याने याबाबत जिल्ह्यातील महिला शिक्षिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करून, हे आदेश बदलण्याची मागणी केली होती. यासंदर्भात जिल्हा शिक्षक संघाचे अध्यक्ष बापू तांबे, नाशिक विभागीय अध्यक्ष आबासाहेब जगताप, राज्य संघाचे उपाध्यक्ष कैलास चिंधे, दत्ता कुलट, उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष रावसाहेब सुंबे, रामेश्वर चोपडे, बाळासाहेब मुखेकर, शिक्षक बँकेचे चेअरमन साहेबराव अनाप, संचालक बाबा खरात, दिपक बोर्हाडे, प्रविण साळवे, महिला आघाडीच्या अध्यक्षा विद्युलता आढाव, मिना जाधव आदींच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांची भेट घेऊन महिलांना या कामासंदर्भात येणार्या अडचणी समजावून सांगितल्या.
तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने राज्य संपर्क प्रमुख रावसाहेब रोहोकले, जिल्हाध्यक्ष प्रविण ठुबे, रा.वि.शिंदे, बी.व्ही.धरम, बाळासाहेब दांडगे, अंबादास गारूडकर, दत्तात्रय गमे आदींनी जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी व जिल्हा उपनिवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील यांची भेट घेतली.
महिला शिक्षकांना मतदान अधिकारी दोन किंवा तीन क्रमांकाची ड्युटी द्यावी व सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष म्हणून प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या ज्या पुरुष शिक्षकांना अद्याप आदेश देण्यात आलेले नाहीत, त्यांच्या नियुक्त्या कराव्यात व महिलांची गैरसोय टाळावी. अशी विनंती करण्यात आली होती. मतदान केंद्राध्यक्ष यांची कामे अडचणीचे व रात्री उशिरापर्यंत चालणारे असल्यामुळे महिला कर्मचार्यांची मोठी गैरसोय होणार आहे. या बाबीकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असता त्यांनी या प्रश्नी योग्य ते बदल करून ज्या महिला सहाय्यक मतदान केंद्राध्यक्षाची बदलण्यात येईल असे आश्वासन दिले.
राज्यात फक्त नगर जिल्ह्यात अशा पद्धतीने नेमणुका देण्यात आल्याने महिला वर्गाने नाराजी व्यक्त केली होती. याची शिक्षक संघाने तातडीने दखल घेऊन जिल्हाधिकार्यांचे याप्रश्नी लक्ष वेधले असून महिला शिक्षकांच्या नेमणुकीचे आदेश लवकरच बदलण्यात येतील असें आश्वासन जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी, जिल्हा उपनिवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील व निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांनी दिले.