बेंगळुरू – करोनामुळे देशात लॉकडाऊन लावले गेले. या काळात सर्वांनाच आपापल्या घरातच राहावे लागले. अर्थात हाच काळ माझ्यासारख्या खेळाडूला मानसिकरीत्या खंबीर बनण्यासाठी उपयुक्त ठरला, असे मत भारताच्या हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीतसिंग याने व्यक्त केले आहे.
मार्च महिन्यापासून देशातच नव्हे तर जगभरात करोनाचा धोका वाढला. त्यापासून बचाव करण्यासाठी लॉकडाऊन लावले गेले. या काळात सर्व व्यवहार ठप्प झाले तसेच क्रीडाक्षेत्रालाही मोठा फटका बसला. अनेक स्पर्धा तसेच सराव बंद झाला. या काळात काही खेळाडूंना नैराश्यही आले. मात्र, माझ्याबाबत बोलायचे झाले तर हा काळ मला खंबीर बनण्यासाठी खूप उपयुक्त ठरला. आता सराव सुरू झाला असून येत्या काळात लांबणीवर टाकण्यात आलेल्या स्पर्धा देखील सुरू होतील. त्यामुळे मानसिक खंबीर बनल्याने सर्व आव्हानांचा सामना करण्यासाठी सज्ज आहे, असेही त्याने सांगितले.
राष्ट्रीय संघाचे सराव शिबिर आता येथे सुरू झाले आहे. त्यासाठी येथे दाखल झाल्यावर सर्वात जास्त आनंद झाला. आम्ही सगळेच खेळाडू दूरध्वनीवरून एकमेकांच्या संपर्कात होतो. मात्र, आता पुन्हा एकदा एकत्र सरावही करता येणार असल्याने पुन्हा संवाद प्रस्थापित होणार आहे. मलाही करोनाची बाधा झाली होती. तसेच अन्य पाच खेळाडूंनाही बाधा झाल्याने शिबिर थांबविण्याचा निर्णय घेतला गेला होता. मात्र, आता यातून आम्ही सुखरूप बाहेर पडलो आहोत, असेही तो म्हणाला.