मुंबई – देशावर सध्या कोरोना विषाणूचे संकट घोंघावत असून या संकटाला थोपविण्यासाठी अख्खा देश लॉक डाऊन करण्यात आला आहे. कोरोनाचे हे संकट परतवण्यासाठी सर्व भारतीय देखील सध्या एकवटल्याचे चित्र असून काही अपवाद वगळता देशभरामध्ये सर्वत्र लॉक डाउनच्या नियमांचे काटेकोर पालन होताना दिसत आहे. दरम्यान, दरवर्षी असंख्य अनुयायांच्या उपस्थितीत देशभरामध्ये साजरी करण्यात येणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देखील यंदा घरातूनच साजरी करण्यात आली आहे.
याच पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंबेडकरी जनतेचे आभार मानले आहेत. उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुकद्वारे जनतेशी संवाद साधताना घरातूनच भीम जयंती साजरी करणाऱ्या सर्व भीमसैनिकांचे विशेष आभार मानतानाच त्यांचे तोंडभरून कौतुक केले. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्वांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देखील दिल्या.