संगमनेर -राज्यातील जनतेला हुकूमशाही तालिबानी ठाकरे सरकारने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी वर्षे असताना देखील देवधर्म मंदिरात कडीकोंडा लावुन बंदिस्त केले आहे. ही तालिबानी मानसिकता राज्यातील जनता सहन करणार नाही, अशी टीका भाजप अध्यात्मिक आघाडी प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी केली.
संगमनेर दौऱ्यावर असताना शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भोसले पुढे म्हणाले की, संगमनेर शहर व तालुक्यात ऐतिहासिक पंरपरा असलेले धार्मिक दर्जाचे अनेक मंदिरे आहेत, राज्यात महाविकास आघाडीचे तीन पक्षाचे सरकार आहे.
सरकारमध्ये प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार व त्याखालोखाल अंत्यत कमी वजन असलेले महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विधानसभा मतदारसंघात संगमनेरकरांनी ठाकरे सरकारच्या नाकावर टिच्चून मंदिरे खुली केली आहे. संगमनेरातील भाविक भक्तांना पवित्र असणाऱ्या श्रावण महिन्यात मंदिरे पुजा-आरती व दर्शनासाठी खुली ठेवण्यात आली.
दारु व्यावसायात महसूल जास्त मिळतो म्हणून दारुचे धंदे चालु आहे आणि मंदिर बंद आहे. शिर्डी देवस्थान हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे, येथे अनेक गोरगरीब, छोटे मोठे व्यावसायिक पोट भरतात पण जिल्ह्यातील तीन मंत्री असुनही त्याकडे दुर्लक्ष आहे. तसेच यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना श्रावणी तिसरा सोमवार आहे जर राज्यातील मंदिरे उघडली नाही तर राज्यव्यापी आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, शहराध्यक्ष ऍड. श्रीराम गणपुले, किसान मोर्चा उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सतिश कानवडे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीराज डेरे, अध्यात्मिक आघाडी जिल्हाध्यक्ष ह.भ.प.गुंजाळ महाराज, रोहिदास कडलग महाराज, अध्यात्मिक आघाडी शहराध्यक्ष किरपाल डंक उपस्थित होते.