मराठा आंदोलकांवरील गुन्ह्यांबाबत बैठक घेणार
मुंबई (प्रतिनिधी) – राज्यहिताच्या दृष्टीने आवश्यक ते प्रकल्प सुरूच राहणार आहेत. गेल्या पाच वर्षांत लोकशाही पद्धतीने करण्यात आलेल्या आंदोलनांत ज्या केसेस दाखल करण्यात आल्या आहेत त्याबाबतही आढावा घेण्यात येत असून निर्दोष असलेल्यांवर कारवाई होणार नाही याची काळजी घेण्यात येईल. मराठा आरक्षण आंदोलनातील गुन्ह्यांबाबत मराठा समाजाच्या नेत्यांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बैठक घेतील, अशी माहिती मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यमंत्रीमंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली.फडणवीस सरकारने घेतलेल्या महत्वाच्या निर्णयांचा आढावा ठाकरे सरकारने घेण्यास सुरूवात केली आहे. सध्या सुरू असलेले प्रकल्प, त्यांची सद्यस्थिती तसेच राज्याची आर्थिक स्थिती, राज्यावर असणारे कर्ज यांचाही आढावा घेण्यास सुरूवात झाली आहे. शेतकरी कर्जमुक्ती, अवकाळी पावसाने अडचणीत आलेला शेतकरी याला कसा दिलासा देता येईल याची विस्तृत चर्चा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रीमंडळ बैठकीत केली आहे. मंत्रीमंडळ बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली.
प्रकल्पांच्या सद्यस्थितीचाही आढावा घेण्यात आला आहे. प्राथमिकता कोणत्या प्रकल्पांना दिली पाहिजे याचीही माहिती घेण्यात येत आहे. कोणतेही विकास प्रकल्प थांबणार नाहीत हे उदधव ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केले आहे. अवकाळीने झालेले नुकसान, शेतकरी कर्जमुक्ती यावर उद्धव ठाकरे यांनी आधीच भूमिका स्पष्ट केली आहे.