मुंबई : भाजपचे विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार किसन कथोरे यांनी आपला अर्ज मागे घेतल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदी कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्षपदाच्या निवडीनंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाना पटोले यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शेतकऱ्याचा पुत्र अध्यक्ष झाला याचा आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
Maharashtra CM Uddhav Thackeray in assembly after Congress leader Nana Patole elected as Speaker: Nana Patole has also come from a farmer family & I am very confident that he will give justice to everyone. https://t.co/L0GalGQlxl pic.twitter.com/X7MlUSZpQb
— ANI (@ANI) December 1, 2019
‘एक बंडखोर स्वभावाचा, अन्याय सहन न करणारा आणि आपले मत मांडायला कोणाचीही परवा न करता धाडस दाखवणारा महाराष्ट्राचा पुत्र हा अध्यक्षपदी विराजमान झाला असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी नाना पटोले यांचे कौतुक केले. भंडारा जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातून तुम्ही आला आहात. संघर्ष करुन तुम्ही इथपर्यंत पोहोचला आहात, त्यामुळे तुम्हाला सर्व गोष्टीची जाण आहे असे देखील त्यांनी सांगितले.
‘आता आपली जबाबदारी वाढली आहे. आम्हाला सांभाळून घेणे आपले काम आहे. तसेच अध्यक्षमहोद्य आपण अन्याय होऊ देणार नाही. तसेच वेळ प्रसंगी चुकलो तर आमचे कान देखील पकडा, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले. समाजातील प्रत्येक स्थराला न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहात आणि राज्यातील प्रत्येक घटकाला न्याय मिळेल अशी अपेक्षा उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.