Thackeray Group on Fadnavis । महायुती सरकारचा शपथविधी काल संपन्न झाला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपद आणि गोपनियतेची शपथ घेतली. या शपथविधीनंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराची उत्सुकता आहे दरम्यान , आजच्या शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून देवेंद्र फडणवीसांना ‘होय, ते पुन्हा आले असे म्हणत खोचक शुभेच्छा देत भाजपवर पुन्हा एकदा टीका करण्यात आलीय
…हलाहल पचवून फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री Thackeray Group on Fadnavis ।
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसणे म्हणजे आता काटेरी खुर्चीवर विराजमान होण्यासारखेच आहे. देवेंद्र फडणवीस त्या महान खुर्चीवर पुन्हा विराजमान झाले. ही त्यांची जिद्द होतीच. त्यांनी दिवसाढवळ्या शपथ घेतली. राज्य बहुमताचे आहे, पण बहुमत खोटे आहे यासाठी लोक गावागावांत रस्त्यावर उतरले आहेत. न्यायालये, निवडणूक आयोग, ईव्हीएम या त्रिवेणी संगमातून महाराष्ट्रात नवे राज्य आले. तरीही देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन!! विधानसभेचे निकाल लागल्यावर तब्बल बारा दिवसांनी महाराष्ट्रात नवे सरकार विराजमान झाले आहे. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस पुन्हा आले. फडणवीस मुख्यमंत्री झाले म्हणजे गुजरातचे बाहुले शिंदे उडाले, हा त्याचा सरळ अर्थ. मात्र त्या शिंद्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांचे उपमुख्यमंत्रीपद तर ध्रुव बाळाप्रमाणे अढळ आहे, पण संघर्ष, अपमान, अवहेलना यांचे हलाहल पचवून फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले हे महत्त्वाचे.
आता मुख्यमंत्री होण्यासाठी त्यांना रात्री-अपरात्री वेषांतर करून, काळोखात लपून-छपून भेटीगाठी घ्याव्या लागल्या नाहीत. विधानसभेचा कौल भाजप व त्यांच्या मित्रपक्षांच्या बाजूने लागला. पूर्ण बहुमत मिळाले. इतकी ‘धो-धो’ मते पडून आपण विजयी झालो कसे? हा प्रश्न फडणवीस यांच्यासह समस्त भाजपला पडला. त्याच अचंबित चेहऱ्याने फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांवर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे. ‘शपथविधीच्या सोहळ्यासाठी आझाद मैदानावर चला’, अशा जाहिराती वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झाल्या. महाराष्ट्राचे दिवाळे वाजत असले तरी शपथ सोहळ्याची दिवाळी साजरी केली गेली. ‘
‘त्या’ हट्टाला न जुमानता फडणवीसांची मुख्यमंत्रीपदाची शपथ
भारतीय जनता पक्षाला 132 जागा मिळाल्या. त्यांचे दोन मित्रपक्ष मिळून सवादोनशेचे पाशवी बहुमत असतानाही बारा दिवसांचा कालावधी सरकार स्थापनेसाठी का लागला? या काळात मावळत्या मुख्यमंत्र्यांचे रुसवे-फुगवे महाराष्ट्राने पाहिले. मीच पुन्हा मुख्यमंत्री होणार व तसे आपल्याला दिल्लीचे वचन आहे हा त्यांचा दावा होता. मी काम केले म्हणून हा विजय भाजपला मिळाल्याचे ते बोलत राहिले. मुख्यमंत्रीपदाशिवाय खाली काहीच घेणार नाही हा त्यांचा हट्ट होता. त्या हट्टाला न जुमानता फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. फडणवीस यांचे सरकार स्थानापन्न होत असताना महाराष्ट्रात आनंदाचे मोठे वातावरण आहे असे दिसत नाही. कारण जनतेला भाजपच्या विजयाचा संशय आहे. हा विजय खरा नाही हे सांगण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत. पुन्हा मतदान घ्या, अशी मागणी गावागावांत सुरू आहे.
मारकडवाडीसारख्या ठिकाणी लोकांनी मतपत्रिकेवर पुन्हा मतदान घेण्याचा प्रयत्न केला, पण 144 कलम लावून पोलिसी दडपशाहीने तेथे लोकशाहीचा गळा घोटला. मारकडवाडीचे हे लोण राज्यातील गावागावांत पसरत गेले तर कायदा- सुव्यवस्थेचे संकट निर्माण होईल. अशा वेळी नवे मुख्यमंत्री दडपशाही करणार की संयमाने वागणार? हा प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीस हे जातीयवादी व सुडाने वागणारे आहेत हा त्यांच्यावरचा ठपका ते कसा पुसणार? यंत्रणांचा गैरवापर व त्यातून दहशत निर्माण करून फडणवीस यांनी पक्षांतर्गत व बाहेरच्या विरोधकांचा काटा काढला.
‘ते गिधाडांचा बंदोबस्त करण्याची हिंमत दाखवतील ?
फडणवीस पुन्हा असेच वागणार असतील तर बहुमत कुचकामी ठरेल. बहुमताचा स्वीकार नम्रपणे करावा व महाराष्ट्र हितासाठी ते कारणी लावावे, असे त्यांच्या चाहत्यांना नक्कीच वाटत असेल. राज्यात अनेक प्रश्न थैमान घालीत आहेत. मराठा आरक्षणापासून रोजगारापर्यंत, शेतकऱ्यांच्या आत्महत्येपासून शेतमालास भाव देण्यापर्यंत. भाजपचा विजय झाल्यापासून मुंबईसारख्या शहरात मराठीद्वेष्टे साप वळवळू व फूत्कार सोडू लागले. मुंबईत मराठी माणूस अपमानित करण्याची एकही संधी हे लोक सोडत नाहीत. मराठीस अभिजात भाषेचा दर्जा दिल्याचा डंका वाजवला, पण मुंबईत मराठी बोलण्यावर व मराठी जगण्यावर दहशतीची गिधाडे फडफडत आहेत व ही गिधाडे स्वतःला भाजप समर्थक म्हणवून घेत असतील तर मुख्यमंत्री म्हणून फडणवीस या गिधाडांचा बंदोबस्त करण्याची हिंमत दाखवतील काय? हे राज्य मराठी भाषिक आहे व त्यासाठी मराठी माणसाने रक्त सांडले आहे याचे स्मरण नव्या सरकारने ठेवायला हवे.
राज्याच्या सर्वोच्च खुर्चीवर बसून देवेंद्र फडणवीस कोणत्या दिशेने जाणार आहेत? लाडक्या बहिणींच्या योजनेमुळे 44 हजार कोटींचा बोजा राज्यावर आहे. 1500 ऐवजी बहिणींना 2100 रुपये देऊ असे या मंडळींनी निवडणूक प्रचारात वचन दिले. त्यामुळे बोजा वाढत जाईल. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचेही वचन आहे. ही वचने पूर्ण करण्यासाठी त्यांना आर्थिक नियोजन व शिस्त लावावी लागेल. मिंधे काळात झालेल्या लुटमारीस पायबंद घालून हे राज्य चोर-दरोडेखोरांच्या हातून सुटले आहे, असा विश्वास जनतेला द्यावा लागेल. मराठा आरक्षणाचे काय करणार? जरांगे नावाचे वादळ फडणवीस यांच्या भोवती घोंघावत आहे. ते शांत झाले नाही तर राज्यात अनेक प्रश्न नव्याने उभे राहतील व सरकार अंतर्गत नवे विरोधक काड्या लावण्याचे काम हौसेने करतील. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसणे म्हणजे आता काटेरी खुर्चीवर विराजमान होण्यासारखेच आहे. देवेंद्र फडणवीस त्या महान खुर्चीवर पुन्हा विराजमान झाले. ही त्यांची जिद्द होतीच. त्यांनी दिवसाढवळ्या शपथ घेतली. राज्य बहुमताचे आहे, पण बहुमत खोटे आहे यासाठी लोक गावागावांत रस्त्यावर उतरले आहेत. न्यायालये, निवडणूक आयोग, ईव्हीएम या त्रिवेणी संगमातून महाराष्ट्रात नवे राज्य आले. तरीही देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन!!