मुंबई : राज्यात राज्यात सध्या कोरोना काळात आलेल्या वाढीव वीज बिलावरून राजकारण तापले असल्याचे दिसत आहे. कारण वाढीव वीज बिलात सवलत देण्यात येणार असल्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले होते.परंतु, या सवलतीपोटी राज्य सरकारवर किमान दोन हजार कोटींचा आर्थिक भार पडणार असल्याने आणि राज्याची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने हा निधी देण्याबाबत वित्त विभागाने आखडता हात घेतला. त्यामुळे ही सवलत देता येणार नसल्याची कबुली दोनच दिवसांपूर्वी ऊर्जामंत्र्यांना द्यावी लागली होती. त्यानंतर आता या वीज बिलांवरुन राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात शाब्दिक युद्ध होताना दिसत आहे.
सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष या वादामध्ये आता भाजपा नेते किरीट सोमय्या यांनीही उडी घेतली आहे. ट्विटरवरुन सोमय्या यांनी “माझे लाईट बिल माझी जवाबदारी” असं म्हणतं ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे. सोमय्या यांनी ट्विटरवर राज्य सरकारने करोनाविरुद्ध लढण्यासाठी राबवलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या लोगोमध्ये बदल करुन त्यात वीज बिलाचा फोटो टाकत, “माझे कुटुंब माझी जबाबदारीच्या यशानंतर ठाकरे सरकारची नवीन योजना, माझे लाईट बिल माझी जबाबदारी”, असा टोला लगावला आहे. हे आपल्याला एका पत्रकाराने पाठवल्याचेही सोमय्या यांनी म्हटले आहे.
याच विषयासंदर्भात गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत विचारमंथन झाले. महावितरणच्या ६७ हजार कोटींच्या थकबाकीने राज्य सरकारची चिंता वाढविली असून, वसुलीसाठी नव्याने मोहीम राबविण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत दोन दिवसांत अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. टाळेबंदीच्या काळात सर्वसामान्यांवर पडलेला वाढीव वीज बिलाचा भार कमी करण्यासाठी वीज बिलात सवलत देण्यावरून, तसेच मंत्रालयांना निधी मिळत नसल्यावरून आक्रमक भूमिका घेणाऱ्या काँग्रेसने मंत्रिमंडळ बैठकीत मात्र सबुरीची भूमिका घेतली.