कोल्हापूर – ठाकरे सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीचा काहीच फायदा शेतकऱ्यांना होणार नाही. सरकार 21 हजार कोटींची कर्जमाफी करत असल्याचा दावाही खोटा असून कर्जमाफीची यादी जाहीर केल्यास सरकार उघडे पडेल, अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर गेलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान समजले नसल्याची टीकाही त्यांनी केली. ते कोल्हापूरात बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या कर्जमाफीवर शेतकरी पूर्णपणे नाराज असल्याचे पुन्हा एकदा राजू शेट्टींनी म्हटले आहे. या कर्जमाफीची एकूण रक्कम 7 ते 8 हजार कोटीच्या वर जाणार नाही. मग ही कर्जमाफी नेमकी कुणासाठी आहे, असा सवाल माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे.
राज्यात सर्वाधिक पीककर्ज वाटप करणारे जिल्हे आहेत. त्यामध्ये एकही जिल्हात 600 ते 700 कोटींच्या वर थकबाकी नाही. त्यामुळे नेमकी कर्जमाफीस पात्र शेतकरी समजू शकत नाहीत. त्यामुळे या कर्जमाफीचा फायदा कोणत्या शेतकऱ्यांना होणार आहे हे जाहीर करा म्हणजे नेमकी किती कोटींची कर्जमाफी आहे हे जाहीर समजू शकेल, असे त्यांनी सांगितले आहे.
दोन लाखापेक्षा जास्त कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही, असा नियम लावला आहे. यामुळे अनेक शेतकरी अपात्र होतील आणि या योजनेचा त्यांना लाभ मिळणार नाही. अधिकाऱ्यांच्यावर विश्वास ठेवून केलेली कर्जमाफी ही चुकीची असल्याचे मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून टीकेची झोड उठत आहे. यातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी देखील आता या कर्जमाफीच्या निकषावर बोट ठेवल्यामुळे ही कर्जमाफी नेमकी कोणासाठी हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.