मुंबई – वर्षभरापूर्वी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये झालेल्या हिंसाचाराविरोधात देशभरामध्ये विविध ठिकाणी निदर्शने करण्यात आली होती. मुंबई येथे देखील या घटनेचा निषेध म्हणून आंदोलन झाले होते. ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे झालेल्या या आंदोलनावेळी ‘फ्रि काश्मीर’ची मागणी करणारे पोस्टर झळकले होते. हा फ्लेक्स हातात घेऊन आंदोलन करणाऱ्या महेक मिर्झा प्रभू या तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मात्र मुंबई पोलिसांनी आता हा गुन्हा मागे घेतला असून यामुळे राज्यातील राजकीय वातारण पुन्हा एकदा तापलं आहे. याबाबत भाजप नेते अतुल भातखळकर यांनी भाष्य करताना राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार तुकडे-तुकडे गॅंगचे समर्थन करत असल्याचा आरोप केलाय. याखेरीज या प्रकरणामुळे शिवसेनेचा खरा चेहरा जनतेसमोर आल्याचंही म्हटलंय.
काय म्हणाले भातखळकर?
भातखळकर यांनी याबाबत ट्विट करताना, “वर्षभरापूर्वी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया वर जेएनयुतील तुकडे गॅंगच्या समर्थनार्थ निदर्शने करणाऱ्या ज्या निदर्शकांच्या हातात “काश्मीर मुक्त करा” चे फलक होते त्यांच्या विरुद्धची तक्रार मागे घेऊन ठाकरे सरकारने तुकडे गँगची पाठराखण केली आहे. हाच आहे शिवसेनेचा खरा चेहरा.” असे टीकास्त्र डांगळे आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
आंदोलनावेळी हातात ‘फ्री काश्मीर’ असे पोस्टर झळकवल्याने महेकवर 7 जानेवारीला आयपीसीच्या कलम 153 ‘बी’अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आता मुंबई पोलिसांनी यासंदर्भात ‘सी’ सारांश रिपोर्ट दाखल केला आहे. सी रिपोर्टनुसार, पोलिसांना यामागे कुठलाही वाईट हेतू दिसून आला नाही. यामुळे महेकवरील गुन्हा मागे घेण्यात आला आहे.
असं असलं तरी सी रिपोर्ट स्वीकारायचा अथवा नाही यासंदर्भात न्यायालय निर्णय घेईल. जेव्हा एखाद्या व्यक्तीवर चुकूण गुन्हा दाखल केला जातो अथवा त्याच्या विरोधात चुकीची तक्रार नोंदवली जाते, तेव्हा, ‘सी’ सारांश रिपोर्ट दाखल केला जातो.
वर्षभरापूर्वी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया वर जेएनयुतील तुकडे गॅंगच्या समर्थनार्थ निदर्शने करणाऱ्या ज्या निदर्शकांच्या हातात “काश्मीर मुक्त करा” चे फलक होते त्यांच्या विरुद्धची तक्रार मागे घेऊन ठाकरे सरकारने तुकडे गँगची पाठराखण केली आहे. हाच आहे शिवसेनेचा खरा चेहरा. pic.twitter.com/o3LlPB7Wi5
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 29, 2020