मुंबई – अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सुप वाजले आहे. या काळात सतराव्या दिवशी उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत एकत्र दिसून आले. या भेटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात अस्वस्थता दिसून येत आहे. तसेच नवीन युतीचा फॉर्म्युला तयार होण्याची शक्यताही राजकीय वर्तुळात रंगत आहे.
2019मध्ये शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षात मुख्यमंत्रीपदावरून दुरावा निर्माण झाल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार बनले. परंतु काही महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदेंनी काही आमदारासह बंड केले आणि भाजपच्या साथीने सरकार बनवले. पंचवीस वर्षांची दोस्ती मोडून वेगळे झालेले दोन नेते विधानभवन परिसरात एकत्र येताना पाहुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
युती तुटल्यानंतर नियमितपणे एकमेकांवर टीकास्त्र डागणारे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवन परिसरात एकत्र एन्ट्री घेतली. यामुळे सर्वांनीच भुवया उंचावल्या. या भेटीनंतर शिंदे गटात चलबिचल झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, उद्धव आणि फडणवीसांच्या भेटीने शिवसेनेच्या शिंदे गटात चलबिचल असल्याचे महाविकास आघाडीचे नेते म्हणत आहेत. याबद्दल शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाईंना म्हणाले की, आमच्या गटातील लोकांच्या चालण्या, बोलण्यात तुम्हाला तसे जाणवले का? चलबिचल आणि चिंता करण्याचे काम आमच्या पक्षातील नेते करत नाही. तसेच महाविकास आघाडीतील नेते सरकार पडेल म्हणून तारखावर तारखा देऊन थकली आहे. पण, अजूनही सरकार पडलेले नाही आणि यापुढेही पडणार नाही. कारण, शिंदे-फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सरकार राज्यात भक्कमपणे उभे असल्याचा त्यांनी दावा केला.