महाविकास आघाडीवर चंद्रकांत पाटील यांचा निशाणा
पुणे – “मंत्रिमंडळाची खाती अद्यापही ठरत नाहीत. कोणतेचे नियम पाळायचे नाहीत, असे या सरकारने ठरवले आहे. कोणते खाते कोणाकडे आहे, हे समजत नाहीत. घटनेतील नियमानुसार किमान 12 जणांचे मंत्रिमंडळ हवे; परंतु महिनाभर सात जणांच्या मंत्रिमंडळावर यांनी कारभार चालवला. त्यामुळे या महिनाभरात त्यांनी स्थापन केलेले मंत्रिमंडळ बेकायदेशीर असून त्यांनी घेतलेले निर्णय रद्दबादल ठरतात,’ असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी केला.
“दोन महिने झाले, तरी मंत्री कोणाला करायचे हे ठरत नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणतात की, “आमच्याकडे गृहमंत्रीपद घेण्यासाठी तुम्ही घ्या तुम्ही घ्या’ असे चालले. वास्तविक हे पद घेण्यासाठी पक्षात कोणीच तयार नाही. सगळेच घाबरट आहेत. असे असताना शिवसेनेला ते पद हवेच आहे, तर त्यांना ते पद का दिले जात नाही. एकूणच सगळे हास्यास्पद सुरू असून, भांडणे, मतभेद निर्णय न होणे असे प्रकार सुरू आहेत,’ अशीही टीका पाटील यांनी यावेळी केली.
वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री झालात का?
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हेक्टर आणि एकर यातील फरक कळत नाही. “साखर विषय आला, की जयंत पाटील आणि महसूल विषय आला की बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाहतो’ असे वक्तव्य ठाकरे यांनी नुकतेच साखर सम्राटांच्या कार्यक्रमात केले होते. त्यांच्याकडे पाहावे लागते तर मग तुम्ही काय करता? केवळ वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही मुख्यमंत्री झालात का? राज्याला असा मुख्यमंत्री चालणार आहे का,’ असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला आहे. “बाळासाहेब ठाकरे यांनी कोणतेच पद घेतले नाही. मात्र येथे स्वत: मुख्यमंत्री झाले आणि पहिल्यांदा निवडून आलेल्या मुलाला कॅबिनेट मंत्री केले. त्याला ट्रेनिंग तरी घेऊ द्या. दुसरीकडे दिवाकर रावते, रामदास कदम, भास्करराव जाधव, भरत गोगावले, तानाजी सावंत यांना घरी बसवले आहे.
16 मंत्रिपदे राष्ट्रवादीला आणि 15 स्वत:कडे घेतली आहेत. 15 मधीलही 2 घटकपक्षांना, 2 घरातच आणि उरलेल्या 10मध्ये ते बसत नाहीत म्हणून वरिष्ठांना घरी पाठवले,’ अशी बोचरी टीकाही पाटील यांनी केली.
एकनाथ खडसे हे पक्षातील वरिष्ठ नेते आहेत. काही कारणाने त्यांच्याबाबत कोणती घटना घडली असेल आणि अन्याय झाला असेल, तर आपण त्यांच्या तक्रारीची चौकशी करू, असे त्यांना समजावले आहे त्यांनाही ते पटले आहे. ते कोणत्याही पक्षात जाणार नाहीत. त्यांना देण्यासाठी आता शिवसेनेकडे काही शिल्लकही नाही. शिवसेनेने आधी प्रताप सरनाईक, संजय राऊत यांचे समाधान करावे.
– चंद्रकांत पाटील, आमदार तथा प्रदेशाध्यक्ष, भाजप.