मुंबई: विधानसभा निवडणुकीनंतर महिनाभर सुरु असलेल्या सत्तानाट्यावर पडदा पडत, महाराष्ट्रात ठाकरेंच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाले आहे. या महाकविकास आघाडीच्या सरकारचा विश्वासदर्शक ठराव आज पार पडला. महाविकास आघाडीने विश्वासदर्शक ठराव 169 मतांनी जिंकला आहे.
या बहुमत चाचणीवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, एमआयएम आणि सीपीआय यांचे एकूण आमदार तटस्थ राहीले आहेत. तर भाजपाने सभात्याग केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस महाविकास आघाडीच्या सरकारची आज शक्तिपरीक्षा होती.
Floor test of Uddhav Thackeray Govt underway in #Maharashtra assembly. pic.twitter.com/AdHKM7NxRG
— ANI (@ANI) November 30, 2019
दरम्यान विधानसभा अधिवेशनाचे हंगामी अध्यक्ष म्हणून माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांची नियुक्ती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केली आहे. शनिवारी दुपारी 2 वाजता विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू झाले. या अधिवेशनात आधी मुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील सदस्य यांचा परिचय झाला. भाजपा आमदारांकडून सभागृहात गदारोळ झाला. आमदारांकडून घोषणाबाजी करण्यात आली. तसेच भाजपाने सभात्याग करत विश्वासदर्शक ठरावावर बहिष्कार टाकला आहे.
संविधानाची पायमल्ली करुन सभागृहाचं कामकाज सुरु आहे, विधानसभा अधिवेशन नियमाला धरुन बोलाविले नाही, राज्यपालांनी कोणतंही समन्स काढलं नाही, त्यामुळे हे अधिवेशन असैविधानिक आहे असा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.