पश्चिम बंगाल मधील प्रभाव ओसरला
कोलकाता – ओडिशाला मोठा धक्का देणाऱ्या फणी चक्रीवादळाचा मोठा तडाखा आज पश्चिम बंगाललाही बसणे अपेक्षित होते पण हे वादळ शनिवारी सकाळी बांगलादेशाकडे सरकल्याने पश्चिम बंगालवरील त्याचा फार मोठा धोका टळला असून तेथील वादळ आता क्षीण झाले आहे अशी माहिती प्रादेशिक हवामाने केंद्राच्या वरीष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. काल रात्री कोलकाता शहरात हलक्या स्वरूपाचे वारे वाहिले त्याचा वेग ताशी केवळ तीस ते चाळीस किमी इतका होता. तथापी या वातावरणामुळे कोलकाता शहरात काल पाऊस पडला. मात्र वादळामुळे किंवा पावसामुळे कोठेही फार मोठे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. शनिवारी सकाळी या वादळाचा पश्चिम बंगालवरील प्रभाव कमी झाला आणि हे वादळ बांगलादेशाकडे सरकले. खरगपुर ते मिदनापुर या भागातून आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमाराला हे वादळ पश्चिम बंगालच्या भूमीत शिरण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. या वादळाला तोंड देण्यासाठी राज्य सरकारने मोठी तयारी केली होती. आपत्ती निवारण पथकासह तेथे सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. पश्चिम बंगाल मध्ये काहीं ठिकाणी मातीची घरे व काही झाडे पडण्याच्या घटना घडल्या आहेत. त्या खेरीज तेथे झालेल्या अन्य नुकसानीचा अंदाज घेण्याचे काम सुरू आहे. पण सुदैवाने फार मोठी हानी झाल्याचे वृत्त नाही.