मुंबई : सध्या राज्यभर गाजत असलेल्या टीईटी घोटाळ्यात शिंदे गटातील एक मोठे नेते म्हणजेच अब्दुल सत्तार यांच्या एका मुलाचे आणि मुलीचे नाव समोर आल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. अब्दुल सत्तार यांच्या चार मुलांचे टीईटी प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याची बाब उजेडात आली आहे. यावरुन आता अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आता या आरोपानंतर सत्तारांवर काँग्रेसकडून निशाणा साधण्यात येत आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अब्दुल सत्तारांवर खोचक टीका केली. टीईटी घोटाळ्याबद्दल विचारले असता चव्हाण यांनी, अब्दुल सत्तारांनाच आता हे शिक्षणमंत्री करतील. चव्हाण यावेळी म्हणाले की, घड्याळाचे काटे उलटे फिरवावे लागले तर फिरवावे लागतील. पण राज्यातील लोकशाही वाचावीच लागेल, असेही ते म्हणाले.
पृथ्वीराज चव्हाण कोल्हापुरात बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, “मोदी सरकारने आतापर्यंत भरमसाठ कर्ज काढलंय. आता नवीन कर्ज मिळेल असं वाटत नाही. देशात कर वाढवले आहेत. पंडित नेहरूंच्या दूरदृष्टीतून उभा राहिलेल्या संस्था विकल्या जात आहे. नोट बंदी सुद्धा फसली आहे. अनेक अविचारी निर्णय केंद्र सरकार कडून घेतले जातं आहेत. नड्डा यांनी संकेत दिले आहेत कि त्यांच्यासोबत गेलेल्या शिवसेनेला संपवून टाकायचं आहे. या आधी काँग्रेस मुक्त भारत घोषणा केली. चुकून दुसरे सरकार आले तर ऑपरेशन लोटस वापरायचे अशी भाजपची खेळी आहे, असे देखील चव्हाण यावेळी म्हणाले.
अडाणींची संपत्ती किती वाढली हे जगातील आठवं आश्चर्य आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत भरमसाठ कर्ज काढलं आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवणं हा सोप्पा पर्याय असतो. नागरिक काही झालं तरी इंधन भरत असतात. देशात आर्थिक संकट आले आहे, देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. अर्थव्यवस्थेबाबत कोरोनाचे कारण दिले जाते मात्र ते खरे नाही. कोरोनाच्या आधीपासून अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. मोदी सरकारकडून एकामागून एक चुका होत गेल्या त्याचा परिणाम झाला आहे. 4.9 हा सगळ्यात निच्चांकी विकास दर आहे, हा आकडा देखील खरा आहे की खोटा हा प्रश्न आहे, असे देखील त्यांनी यावेळी म्हटले.