पुणे – परीक्षा परिषदेने घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) प्रश्नपत्रिकेत भरमसाठ चुका झाल्याप्रकरणी संबंधित एजन्सीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. सात दिवसांत खुलासा सादर करण्यास मुदत देण्यात आलेली आहे.
राज्यात 19 जानेवारी रोजी “टीईटी’ घेण्यात आली. परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत एकेका पानात 30-35 शुद्धलेखानाच्या चुका झाल्या आहेत. काही प्रश्नांचे पर्याय चुकीचे दिले आहेत. काही प्रश्नांचे वाक्य अर्धवट अर्धवट होते. या चुकांवर विद्यार्थ्यांकडून आक्षेपही मागवण्यात आले होते. त्याचा अंतिम अहवालही तयार करण्याचे कामकाज सुरू करण्यात आले आहेत. यावरुन सुमारे आठ-दहा प्रश्न रद्द होण्याची शक्यता आहे.
“टीईटी’ परीक्षेच्या पाठापाठ इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतही संबंधित एजन्सीने चुका केलेल्या आहेत. त्यामुळे आता पहिल्या टप्प्यात “टीईटी’च्या परीक्षेतील चुकांप्रकरणी एजन्सीला राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी नुकतीच नोटीस बजावली आहे.