पुणे – आरोग्य विभागातील कर्मचारी भरती परीक्षेपाठोपाठ आता शिक्षक पात्रता परीक्षेचाही (टीईटी) सावळा गोंधळ सुरू आहे. नांदेडमधील विधानसभेच्या पोटनिवडणुकीचे कारण पुढे करून “टीईटी’ तिसऱ्यांदा लांबणीवर पडणार आहे.
दरम्यान, “टीईटी’ घेण्यासाठी संबंधित खासगी कंपनीची पूर्ण तयारी झाली नसल्याने परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की ओढवल्याची चर्चा सुरू आहे. “टीईटी’ दिवाळीनंतरच होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 19 जानेवारी 2020 नंतर “टीईटी’ झाली नव्हती. त्यानंतर आधी 10 ऑक्टोबर ही तारीख जाहीर झाली. यासाठी 3 लाख 30 हजार 542 उमेदवारांनी नोंदणी केली होती. मात्र, या दिवशी केंद्रीय लोकसेवा आयोगाची लेखी परीक्षा होती. एकाच दिवशी दोन परीक्षा नको म्हणून “टीईटी’ पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.
सुधारित वेळापत्रकाद्वारे “टीईटी’साठी 31 ऑक्टोबर ही नवी तारीख निश्चित केली. या दिवशी आरोग्य विभागाच्या कर्मचारी भरतीची लेखी परीक्षा आहे. त्यामुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे “टीईटी’ची तारीख बदलण्याची विनंती केली होती. त्यानुसार हा निर्णय झाला.
नांदेड जिल्ह्यात देगलूर-बिलोली या विधानसभा मतदाराची पोटनिवडणूक 30 ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे या दिवशी “टीईटी’ घेणे शक्य नाही. नांदेड जिल्ह्यातील 965 उमेदवारांनी “टीईटी’साठी नोंदणी केली आहे. परीक्षा केंद्र व मतदान केंद्र यात खूप अंतर असल्याने संबंधितांना मतदानाचा हक्क बजाविण्यात अडचणी निर्माण होतील. त्यामुळे “टीईटी’च्या तारखेत पुन्हा बदल करावा लागणार असून प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
कंपनीला कामकाजाचा डोलारा पेलवेना?
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतील “ओएमआर’ बेस परीक्षा घेण्याचा ठेका “विनर’ सॉफ्टवेअर या खासगी कंपनीला दिला आहे. प्रति विद्यार्थी 180 रुपये 54 पैसे याप्रमाणे कंपनीला परीक्षेसाठी मोबदला मिळणार आहे. “टीईटी’ही याच कंपनीमार्फत घेण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र, अद्याप प्रवेश पत्रही उमेदवारांना मिळालेले नाहीत. या कंपनीला परीक्षांच्या कामकाजाचा डोलारा पेलवत नाही. त्यांच्याकडे पुरेसे मनुष्यबळ, सक्षम यंत्रणाही उपलब्ध नाही. त्यामुळे विविध परीक्षांचे अर्ज नोंदणीपासून निकाल लावण्यापर्यंतचे सर्वच वेळापत्रक सतत कोलमडत असते. कंपनीचे प्रतिनिधी अधिकाऱ्यांनाही फारसे जुमानतच नाहीत. तेच अधिकाऱ्यांवर रुबाब दाखवितात, असे परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांकडून दबक्या आवाजात बोलले जात आहे. दरम्यान, परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांमध्येही आपापसात ताळमेळ नसल्याचे दिसून येते.