करोना संसर्ग वाढतोय : शहरात साथ पुन्हा वेगाने वाढण्याची भीती
पुणे – महाराष्ट्रासह केरळमध्ये करोना बाधितांचा आकडा पुन्हा वाढला आहे. अनलॉकमुळे अनेक जण केरळ पर्यटनासाठी जात असून, परत आल्यानंतर त्यांना करोनाची लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शहरात “केरळ’मधून येणाऱ्या नागरिकांना आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. मागील आठवड्यापासून शहरात करोना बाधितांची संख्या लक्षणीय वाढत आहे. पूर्वीच्या साथीच्या तुलनेत हा वाढणारा हा आकडा कमी असला, तरी ही साथ पुन्हा वेगाने वाढण्याची भीती आहे.
त्यातच, केरळ आणि महाराष्ट्रात सर्वाधिक नवीन बाधित सापडत आहेत. परिणामी, साथ प्रतिबंधासाठी महापालिका प्रशासनाने कडक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी गुजरात, गोवा, राजस्थान तसेच दिल्लीहून येणाऱ्या प्रवाशांना करोना चाचणी बंधनकारक करण्यात आली होती. त्यानंतर यात आयुक्तांनी केरळचाही समावेश केला आहे. त्यासाठी स्वतंत्र आदेश काढण्यात आले आहेत.
पर्यटकांची अडचण
मिशन बिगिन अगेनअंतर्गत पर्यटनासह अन्य बाबींवरील निर्बंध बहुतांश प्रमाणात उठवण्यात आले आहे. त्यामुळे आंतरराज्य पर्यटन पुन्हा सुरू झाले. पुण्यातूनही अनेक नागरिक केरळमध्ये गेले असून त्यांना केरळमध्ये चाचणी करूनच पुण्यात यावे लागणार आहे. दरम्यान, महापालिकेकडे केवळ रेल्वे स्टेशन आणि विमानाद्वारे आलेल्या प्रवाशांची तपासणी करण्यासाठी यंत्रणा आहे. त्यामुळे केरळवरून येताना बंगळुरू, हैद्राबाद अथवा गोव्यातून प्रवासी पुण्यात आल्यास त्याची तपासणी कशी होणार, याचे उत्तर महापालिका प्रशासनाकडे नाही.