‘सज्जनांचा खेळ’ अशी ओळख असलेला क्रिकेटचा खेळ जनसामान्यांवर आजही गारुड ठेवून असला तरीही आता कसोटी क्रिकेटचे भवितव्य काय; असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. त्यामुळे क्रिकेटचा दर्जाच तर घसरणार नाही ना अशी शंका येऊ लागली आहे. आज जागतिक स्तरावरील संघ पाहिले तर फक्त इंग्लंड व ऑस्ट्रेलियाच्या संघातच कसोटी स्पेशालिस्ट क्रिकेटपटू दिसून येतात बाकीच्या देशांचे संघ पाहिले तर सगळाच आनंदीआनंद आहे.
नवी पिढीदेखील कसोटी क्रिकेटचा आदर्श ठेवण्यापेक्षा टी-20 च्या जंकफुडवर पोसली जात आहे मग त्यात दर्जा, तंत्र व संयम येणार कसा हादेखील प्रश्नच आहे. पाच-पाच दिवस चालणारे सामने, निकाल न लागणे, प्रेक्षकांची वानवा आणि प्रायोजकांची खप्पामर्जी यामुळे त्रस्त झालेल्या कसोटी क्रिकेटला पर्याय म्हणून 1970 च्या दशकात मर्यादीत षटकांचे क्रिकेट सुरू झाले.
सुरूवातीला 60 षटकांचे सामने होत होत; नंतर त्यातही कपात केली गेली व 50 षटकांचे सामने खेळवले जाऊ लागले. मात्र, पहिल्या 15 षटकांनंतर जवळपास 40 वे षटक सुरू होईपर्यंत सामना रटाळच बनत चालला होता. त्यातून मार्ग काढण्यासाठी टी-20 हा आणखी वेगवान प्रकार दाखल झाला. खरे तर, क्रिकेटचे जन्मदाते असलेल्या इंग्रजांनीच या प्रकाराचाही शोध लावला. केवळ तीन तासांत संपणारे युरोपातील फुटबॉल सामने जास्त लोकप्रिय होत होते. त्यामुळे पाच दिवसांच्या तसेच एकदिवसीय सामन्यांच्या प्रेक्षक संख्येत कमी आली आणि अस्तित्व टीकून राहण्यासाठी या प्रकारच्या क्रिकेटला शुभारंभ झाला. एकेकाळी क्रिकेटचा अतिरेक होत आहे अशी ओरड भारतातही होत होती. आता टी-20 मुळे कसोटी क्रिकेट इतिहास जमा होईल, अशी ओरड सुरु झाली आहे.
“खरे क्रिकेट म्हणजे कसोटी क्रिकेटच’ असे म्हणणारी पिढीही आता काळाच्या पडद्याआड जाऊ लागली आहे. नवोदितांसाठी तर टी-20 हेच क्रिकेट झाले आहे. त्यांना निकाल न लागणारे कसोटी क्रिकेट तर नकोच आहे; पण आता सात-सात तास चालणारे एकदिवसीय क्रिकेटही नकोसे झाले आहे.
वेगळ्या शब्दांत सांगायचे तर, कसोटी क्रिकेट ही परिपूर्ण व सात्विक भोजनाची थाळी आहे आणि टी-20 क्रिकेट म्हणजे जंकफुड. आता याच जंकफुडमुळे कसोटी क्रिकेटला अजिर्ण होत आहे. आज एका षटकांत 20-25 धावाही सहज काढल्या जातात. मग तंत्र असो वा नसो. “धावा येतात ना मग झाले तर…’, हा विचार रुजू लागला आणि त्यातून काय भयानक चित्र उभे राहते आहे, ते ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या ऍडिलेड कसोटीत भारतीय संघाचे अवघ्या 36 धावांवर पानिपत झाले, तेव्हाच लक्षात आले.
खेळपट्टीवर येत असलेले फलंदाज कोणी नवखे नव्हतेच; मात्र, तरीही त्यांना दोन आकडी धावाही करता आल्या नाहीत. “रनमशिन’ म्हणून नावाजला गेलेला विराट कोहली देखील धावांसाठी चाचपडताना दिसला तिथे इतरांची काय कथा? कसोटी क्रिकेटसाठी अत्यंत शास्त्रीय तंत्र लागते. टी-20 साठी तंत्रच गुंडाळून ठेवले जाते, हाच मोठा फरक क्रिकेटच्या या दोन प्रकारात असतो. कसोटी क्रिकेट म्हणजे “शास्त्रीय संगीत’ आणि टी-20 म्हणजे “ऑर्केस्ट्रा’ असेच म्हणावेसे वाटते.
आज भारताचा कसोटी संघ पाहिला, तर कोहलीसह अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी व काही अंशी लोकेश राहुल हे चारच परिपूर्ण कसोटी फलंदाज आहेत. सलामीवीर मयंक आग्रवाल, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, शुभमन गील हे कसोटी फलंदाज नव्हेत. आयपीएल किंवा तत्सम टी-20 क्रिकेटच्या रतीबावर वाढलेले हे फलंदाज भारताचे कसोटीतील भविष्य बनूच शकत नाहीत हे कोणीही नाकारणार नाही. ना त्यांच्याकडे तंत्र, ना खेळपट्टीवर तासंनतास उभे राहण्याचा संयम ना मोठी खेळी करण्याची इच्छाशक्ती. हे असे चित्र असताना संघाला विक्रमादीत्य सुनील गावसकर किंवा राहुल द्रविड कसे मिळतील? “ऑफला बॅट फिरली, लेगला चौकार गेला’; “स्क्वेअरकट मारला व थर्डमॅनला कत्ती लागून चौकार गेला’, या धाटणीतले हे फलंदाज सामना वाचवण्यासाठी एकही धाव किंवा एकही आक्रमक फटका न मारता कसोटी सामन्यातील एक पूर्ण सेशन खेळून काढतील का, हा मोठा प्रश्न आहे.
एके काळी सुनील गावसकर एकदिवसीय सामन्यात पहिल्यांदाच खेळत होते. 60 षटकांच्या या सामन्यात नक्की कशी फलंदाजी करायची, हेच ठावूक नसल्याने ते संपूर्ण 60 षटके खेळले व त्यांनी नाबाद 36 धावा केल्या. त्यावेळी त्यांच्यावर टीका झाली होती की, इतकी संथ फलंदाजी का केली म्हणून. पण क्रिकेटचा हा प्रकार पहिल्यांदाच पहात असल्याने कशी फलंदाजी करायची हेच समजले नाही, म्हणून हे घडल्याचे खुद्द गावसकरांनीच प्रांजळपणे सांगितले होते.
आता परिस्थिती तीच आहे फक्त चित्र पालटले आहे. इथे एका षटकांत जास्तीत जास्त धावा करायच्या असल्याने “हीट आऊट-गेट आऊट’च्या या जमान्यात टी-20 ऐवजी कसोटीत कसे खेळायचे हेच आता सध्याच्या फलंदाजांना समजेनासे झाले आहे. आता तर खुद्द गावसकरांचेही मत परिवर्तन झाले आहे. समालोचन करताना त्यांनी एकदा सांगितले होते, “धावा या धावा असतात; त्या कशा येतात हे महत्वाचे नाही.’ बघा दर्जा आणखी किती खाली जाणार आहे.
आता तर टी-20 क्रिकेटही सहाव्या षटकापासून 14 व्या षटकापर्यंत रटाळ होते असेही मत व्यक्त करणारे काही महाभाग समोर आले आणि त्यांनी आपली नासलेली डोकी चालवून 10-10 षटकांचे तसेच 100 बॉल्स क्रिकेट आणले. आश्चर्य याचे वाटते की, या टी-20 पेक्षाही वेगवान क्रिकेटला डोक्यावर घेणारे चाहतेही क्रिकेटच्या जन्मदात्या इंग्लंडमध्ये निर्माण झाले आहेत.
अशा वातावरणात कसोटी क्रिकेटचा गळा घोटला जाणार हे सांगायला कोणा ज्योतिषाची आवश्यकता नाही. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आज जागतिक क्रिकेटमधील बहुसंख्य विक्रम आहेत. त्याने आपली गुणवत्ता सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये सिद्धही केली आहे. मात्र, तरीही सर गॅरी सोबर्स किंवा महान खेळाडूंच्या यादीतील आणखी काही माजी कसोटी क्रिकेटपटू सचिनपेक्षा परिपूर्ण कसोटी फलंदाज म्हणून आजही राहुल द्रविडचेच नाव घेतात. “जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर संघात सचिन हवा मात्र, जर तुम्हाला सामना वाचवायचा असेल तर, संघात द्रविडच हवा’, या त्यांच्या मतातूनच सर्व काही स्पष्ट होते. कसोटी सामना हा क्रिकेटचा गाभा आहे. त्याला धक्का लागला तर क्रिकेटचाच ऱ्हास होईल, मग ते एकदिवसीय असो किंवा टी-20 क्रिकेट.
खूप वर्षांपूर्वी मुंबईतील एका प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षकाकडे एक महिला आल्या व त्यांनी आपल्या मुलाला प्रशिक्षण देण्याची विनंती केली. त्यावेळी त्या म्हणाल्या की, माझा मुलगा देशाकडून नाही खेळला तरी चालेल पण त्याला आयपीएल खेळता आले पाहिजे. म्हणजे बघा विचारांची पातळीही कीती खालावली आहे.
आता 19 व्या शतकाच्या अखेरपर्यंत जे खेळाडू क्रिकेटचे धडे गिरवत होते, त्यांचे देशाकडून खेळण्याचे स्वप्न असायचे आता स्वप्नही बदलली. भूक लागल्यावर वडापाव खाणे ही गरज असते पण ते पूर्ण जेवण होऊ शकत नाही. त्याप्रमाणे खरे क्रिक्केट हे कसोटी क्रिकेट आणि टी-20 क्रिकेट हे जंकफुडच. जंकफूडने पोट भरेल; पण तृप्तीची ढेकर येणार नाही.