नवी दिल्ली – निवड समितीने संघातून बाहेर काढताना अत्यंत अपमानास्पद वागणूक दिल्याची टीका सिक्सरकिंग युवराजसिंगने केली होती. त्यावर स्पष्टीकरण देताना युवराजच्या खेळाचा दर्जा घसरल्यामुळेच त्याला संघातून बाहेर काढले गेले, असे मत तत्कालीन निवड समितीचे सदस्य व माजी कसोटीपटू रॉजर बिन्नी यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
गेल्या वर्षी जूनमध्ये युवराजने निवृत्ती जाहीर केली होती. त्यावेळी त्याला एका हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर करावा लागला होता. त्यावेळी त्याने बीसीसीआयच्या भूमिकेवरही टीका केली होती. मला मैदानात निवृत्ती जाहीर करायची होती व त्यासाठी अखेरचा सामना दिला जावा, अशी मी अपेक्षा केली होती. मात्र, बीसीसीआयने व तत्कालीन निवड समितीने ही मागणी फेटाळून लावत अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली, असे युवराजने सांगितले होते.
याच गोष्टीचा उल्लेख त्याने आता काही दिवसांपूर्वीही एका ऑनलाइन चॅट शोमध्ये केला होता. युवराजच्या या वक्तव्यावर अनेकांनी निवड समितीच्या दृष्टिकोनावर टीका केली होती. अखेर त्यावेळी निवड समितीचे सदस्य असलेल्या बिन्नी यांनी खुलासा केला आहे. 2011 साली झालेल्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील अफलातून कामगिरीनंतर युवराजच्या खेळाचा दर्जा घसरला. त्याला वारंवार संधी देऊनही त्याने स्वतःला सिद्ध केले नाही. एखाद्या सामन्यात अपयशी ठरला म्हणून त्याला वगळण्यात आले नव्हते तर सातत्याने संधी देऊनही त्याच्याकडून धावा होत नव्हत्या. त्याची कामगिरी सुधारल्याचे दिसले नाही. त्यामुळेच त्याला संघातून बाहेर ठेवण्यात आले, असे मत बिन्नी यांनी व्यक्त केले आहे.
निरोपाचा सामना देणे हा निर्णय निवड समिती नव्हे तर बीसीसीआय घेते. त्यामुळे निवड समितीने असा सामना दिला नाही हे आरोप तथ्यहिन आहेत. वास्तविक युवराजनेच याबाबत मागणी करायला हवी होती, असेही बिन्नी यांनी स्पष्ट केले