अहमदाबाद – अक्सर पटेल आणि रविचंद्रन अश्विन यांची फिरकी आणि ऋषभ पंत (101) शतक तर वॉशिंग्टन सुंदरच्या (96) अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने चौथ्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडचा एक डाव आणि 25 धावांनी पराभव केला. भारताने 3-1 अशा फरकाने मालिका जिंकत वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. ऋषभ पंत सामनावीर ठरला.
फलंदाजी आणि गोलंदाजीसह भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या आर. अश्विनला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला. यासह अश्विनने कसोटीत विक्रम स्थापित केला आहे. भारतीय अष्टपैलू अश्विनने मालिकेतील चारही सामन्यात तब्बल 32 विकेट्स घेतल्या. यात एक-दोन नव्हे तर तीन फाइव्ह विकेट हॉल्सचा समावेश आहे. तसेच फलंदाजी करताना एकूण 189 धावा केल्या. यात दुसऱ्या कसोटी सामन्यातील त्याच्या 106 धावांच्या झुंजार शतकाचा समावेश आहे. हा अश्विनचा कसोटी कारकिर्दीतील पहिलावहिला नव्हे तर आठवा मालिकावीर पुरस्कार आहे.
यासह अश्विन कसोटीत सर्वाधिक वेळा मालिकावीर ठरणारा पहिला भारतीय आणि जगातील तिसरा क्रिकेटपटू ठरला आहे. याबाबतीत त्याने भारतीय दिग्गज सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांना पिछाडीवर सोडले आहे. तसेच कसोटीत मुथय्या मुरलीधरन सर्वाधिक 11 वेळा मालिकावीर ठरला आहे. त्यानंतर जॅक कॅलीसने 9 वेळा हा बहुमान पटकाविला आहे.