सिडनी – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि आक्रमक फलंदाज विराट कोहलीसारख्या क्रिकेटपटूंमुळे कसोटी क्रिकेट जिवंत आहे. विराट हा आक्रमक क्रिकेटचे उत्तम उदाहरण आहे. भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यासारख्या संघांमुळे क्रिकेट लीगच्या लाटेत कसोटी क्रिकेट तरू शकले आहे, असे ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार अॅलन बॉर्डर यांनी सांगितले आहे.
अखेरच्या तीन कसोटी सामन्यांत विराटच्या अनुपस्थितीमुळे बॉर्डर-गावस्कर चषकावर नाव कोरण्याची ऑस्ट्रेलियाची शक्यता वाढली आहे. विराट फक्त पहिल्याच कसोटी सामन्यात खेळणार आहे, ही एकच बाब ऑस्ट्रेलियासाठी अनुकूल ठरते आहे. मात्र हीच भारतासाठी मोठी चिंता ठरेल. एक फलंदाज आणि कर्णधार म्हणून विराट अतुलनीय आहे. पण विराट नसल्यास ऑस्ट्रेलिया ही मालिका 2-1 अशी जिंकू शकेल, असा दावा बॉर्डर यांनी केला आहे.
इंडियन प्रीमियर लीगपेक्षा (आयपीएल) ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला खेळाडूंनी प्राधान्य देण्याची नितांत आवश्यकता आहे. सर्वच देशांच्या राष्ट्रीय क्रिकेट मंडळांनी आपल्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्यास बंदी घालावी, असे आवाहन बॉर्डर यांनी केले आहे. ट्वेन्टी-20 लीग म्हणजे खेळाडूंना भरमसाट पैशांची कमाई करून देणारे व्यासपीठ आहे. त्यामुळेच मला त्या आवडत नाहीत. स्थानिक लीगपेक्षा जागतिक स्पर्धाना महत्त्व देण्याची गरज आहे, असेही बॉर्डर म्हणाले.