चेन्नई – इंग्लंडविरुद्धच्या 4 कसोटी सामन्यांच्या पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर भारताच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पात्र होण्यासाठी इंग्लंडविरुद्धच्या उरलेल्या तिनही कसोटींत दोन विजय मिळवणे आवश्यक बनले आहे.
इंग्लंडने चेन्नईतील कसोटीतील विजयासोबत या स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वलस्थान प्राप्त केले असून भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. भारताला आता या मालिकेच्या उर्वरित 3 पैकी किमान 2 सामन्यांत विजय मिळवावा लागेल.
भारताने जर एकही सामना गमावला तर फायनलच्या शर्यतीतून बाहेर होईल. या निकालामुळे ऑस्ट्रेलिया देखील पात्र होण्याची आशाही वाढली आहे.
ऑस्ट्रेलियाचे भविष्यही भारत व इंग्लंड यांच्यातील मालिकेवर अवलंबून आहे. इंग्लंड ही मालिका 1-0 ने जिंकल्यास ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडबरोबर अंतिम सामन्यात खेळेल. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिका दौरा रद्द केल्यानंतर न्यूझीलंडची अंतिमफेरीतील जागा पक्की झाली आहे. यावर्षी जूनमध्ये लॉर्डस येथे यास्पर्धेचा आंतिम सामना रंगणार आहे.