नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधून कलम 370 संपुष्टात आणल्यानंतर पाकने हा मुद्दा आंतरराष्ट्रीय मंचावर उपस्थित करण्याचा प्रयत्न सुरु केला असतानाच पाकिस्तानला युरोपीय महासंघाने मोठा झटका दिला आहे. युरोप महासंघाच्या अनेक सदस्यांनी एकसुरात पाकिस्तानवर कठोर शब्दांत टीका केली. आपल्याला भारताला पाठिंबा दिला पाहिजे कारण पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांना संरक्षण मिळते आणि ते शेजारी देशात हल्ले करतात, असे या सदस्यांनी म्हटले आहे.
युरोपीय महासंघाने 11 वर्षांत पहिल्यांदाच काश्मीर मुद्द्यावर चर्चा केली आणि जाहीररित्या भारताचे समर्थन केले. यावेळी त्यांनी दहशतवादावरुन पाकिस्तानवर टीका देखील केली. संसदेत चर्चेदरम्यान पोलंडचे नेते आणि महासंघाचे सदस्य रिजार्ड जार्नेकी म्हणाले की, भारत जगातील सर्वांत महान लोकशाहीचा देश आहे. आपल्याला भारताच्या जम्मू-काश्मीरमध्ये होणाऱ्या दहशतवादी घटनांकडे लक्ष देण्याची गरज आहे. हे दहशतवादी चंद्रावरुन येत नाहीत. ते शेजारील देशातूनच (पाकिस्तान) येत आहेत. अशावेळी आपल्याला भारताचे समर्थन केले पाहिजे.
तसेच ते पुढे म्हणाले की, पाकिस्तान अण्वस्त्रांचा वापर करण्याची धमकी भारताला देत असल्याचेही इटलीचे नेते आणि युरोपीय महासंघाचे सदस्य फुलवियो मार्तुसिलो यांनी सांगितले. यावेळी त्यांनी स्थानिक हल्ल्यांचा उल्लेख करत युरोपमध्ये दहशतवादी हल्ला करण्याचा कट देखिल पाकिस्तानातच रचला जातो त्यामुळे भारताचे समर्थन करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी युरोपियन संसदेने म्हटले की, काश्मीर मुद्यावर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी थेट चर्चा करायला हवी. जेणेकरून यावर शांततेच्या मार्गाने तोडगा काढला जाऊ शकेल. शिवाय यावेळी हे देखील स्पष्ट करण्यात आले की, या मुद्यावर कोणी तिसऱ्याने हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच येत नाही.